मध्यप्रदेशातील गुना या ठिकाणी एका शेतकरी कुटुंबावर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन विरोधी पक्षांनी भाजपावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान अभिनेता कमाल आर खान याने देखील या प्रकरणावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. गरीबांवर असा अमानुष हल्ला फक्त भारतातच होऊ शकतो अशी टीका त्याने केली आहे.

“गरीबांवर असा अमानुष हल्ला फक्त भारतातच होऊ शकतो. आपल्याला आता लाजही वाटत नाही. खरंच या लोकांना पोलीस दलात सामिल करण्यापूर्वी योग्य प्रशिक्षण मिळतं का?” अशा आशयाचे ट्विट करुन कमाल खानने या प्रकरणाबाबत आपला संताप व्यक्त केला आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

यापूर्वी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी देखील या प्रकरणावरुन भाजपावर निशाणा साधला होता. “गरीबांवर हल्ला, दलितांवर हल्ला, शेतकऱ्यांवर हल्ला, लोकशाहीवर हल्ला हाच आहे भाजपाचा खरा चेहरा आणि चरित्र. याविरोधात काँग्रेस निकराने लढा देणार” असं ट्विट त्यांनी केलं होतं. बुधवारी सोशल मीडियावर एका शेतकरी दाम्पत्याला पोलीस अत्यंत अमानुषपणे मारहाण करत आहेत हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि शिवराज सिंग चौहान सरकारवर टीका होण्यास सुरुवात झाली. एका शेतकरी दाम्पत्याला पोलिसांनी मारहाण केली. या व्हिडीओत त्यांना काही लोक वाचवण्याचाही प्रयत्न करत असताना दिसत आहेत. मात्र त्यांनाही पोलिसांनी मारहाण केली.