बॉलिवूड अभिनेता कमाल आर. खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो अनेकदा बॉलिवूड कलाकारांवर टीका करतो. यावेळी त्याने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीचं निमित्त साधून अभिनेत्री तापसी पन्नूवर निशाणा साधला आहे. तापसीनं या प्रकरणात रिया चक्रवर्तीला पाठिंबा दिला. तिच्या या निर्णयावर कमाल खानने संताप व्यक्त केला आहे. जनता तुला माफ करणार नाही, अशा शब्दात त्याने तापसीबद्दल राग व्यक्त केला आहे.

“तापसी म्हणाली, रिया चक्रवर्ती एक पवित्र मुलगी आहे. जनता आणि माध्यमांना रियाला दोषी ठरवण्याचा काहीही अधिकार नाही. मला खात्री आहे रिया निर्दोष सुटेल. तिला न्याय मिळेल. तापसी पन्नू मला तुला केवळ एकच सांगांयचंय की जनता हे लक्षात ठेवेल. कोणीही तुला माफ करणार नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन कमाल खानने तापसीबद्दल राग व्यक्त केला आहे.

तापसीनं अभिनेत्री लक्ष्मी मानचू हिच्या ट्विटला रिट्विट करत सुशांत प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. “मी सुशांत किंवा रियाला वैयक्तीक पातळीवर ओळखत नव्हते. एखादा व्यक्तीला कायद्याने दोषी ठरवण्याच्या आधीच त्याला गुन्हेगार म्हणून घोषित करणे चुकीचं आहे. कृपया या देशातील न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा.” अशा आशयाचं ट्विट करुन तापसीनं रियाला पाठिंबा दिला होता. १४ जून रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. त्यानंतर सुशांतचे वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात पोलीस तक्रार केली. सीबीआयमार्फत सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.