शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सुशांत सिंह राजपुत मृत्यू प्रकरणावर भाष्य करताना सुशांतचे वडिल के.के. सिंह यांच्या दुसऱ्या लग्नावर प्रश्न उपस्थित केले होते. या लग्नामुळे सुशांत आपल्या वडिलांवर नाराज होता असा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे सुशांतच्या वडिलांनी खरंच दुसरं लग्न केलं होतं का? असा प्रश्न सर्वत्र चर्चेत आहे. या चर्चेवर अभिनेत्री काम्या पंजाबी हिने संताप व्यक्त केला आहे. सुशांतच्या वडिलांबाबत अशा खोट्या बातम्या पसरवून नेमकं काय साध्य करायचं आहे? असा सवाल तिने केला आहे.

अवश्य पाहा – सुशांतनं पत्ता म्हणून दिलेला फ्लॅट आठ वर्षांपूर्वीच रियाच्या वडिलांनी घेतला होता विकत

अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरण: संजय राऊत यांच्यावर सुशांतचं कुटुंब ठोकणार मानहानीचा दावा

“काहीही काय बोलताय? वडिलांनी दुसरं लग्न केलं? आनंदी राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. (कुठल्या मागास विचारांचा प्रचार करताय) सुशांत आनंदी नव्हता आम्ही नाही मानत, आणि समजा तुमचा दावा मान्य केला तरी तुम्ही नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न करताय?” अशा आशयाचं ट्विट काम्या पंजाबी हिने केलं आहे. सुशांत प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तिचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

संजय राऊत यांनी सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यावरून ‘रोखठोक’ सदरातून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या या सदरावर सुशांतच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली होती. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार सुशांतचे चुलत भाऊ भाजपा नेता नीरज सिंह बब्लू यांनी तर थेट संजय राऊत यांच्या विरोधात मानहानिचा दावा ठोकण्याचा इशारा दिला. “सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत. असे खोटे आरोप करणं चुकीचं आहे. अफवा पसरवून संजय राऊत या प्रकरणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. कुटुंबावर केलेल्या या आरोपासाठी आम्ही त्यांच्यावर मानहानिचा दावा ठोकणार आहोत.” अशी प्रतिक्रिया नीरज सिंह यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत दिली होती.