सिनेमासोबतच मालिकांनाही आज अनन्यसाधारण महत्त्व दिले जात आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही विभागातील मालिकांचे कलाकारही बरेच नावारुपास येत आहेत. पण, या कलाकारांमध्ये असणारे मैत्रीचे नाते काही औरच. अशीच एक जोडी म्हणजे प्रत्युषा बॅनर्जी आणि काम्या पंजाबी. ‘बालिका वधू’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने १ एप्रिल २०१६ मध्ये तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.

प्रत्युषाच्या आत्महत्येला आज दोन वर्ष झाली. दोन वर्षांनंतरही तिला अजून न्याय मिळाला नाही. या कारणामुळेच टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिच्या मनातील चीड स्पष्ट जाणवते. काम्याने लिहिले की, आपल्या आयुष्याची पर्वा करा. कारण तुमच्या जीवाची इथे कोणालाही पर्वा नाही. लोक काळांतराने तुम्हाला विसरून जातात. माझ्या या पोस्टवर कृपा करुन RIP लिहून श्रद्धांजली वाहू नका. जर तुम्हाला खरंच काही करायचं असेल तर एक काम करा की प्रेमात आंधळे होऊ नका. घरगुती हिंसेचा विरोध करा. आयुष्य खूप सुंदर आहे.

टीव्ही अभिनेता नीरज व्यासने प्रत्युषासोबतचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. प्रत्युषाचा ‘हम कुछ कह न सके’ हा लघुपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. मात्र न्यायालयाने या लघुपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणली. अनेकांनी तिच्या आत्महत्येमागच्या मूळ कारणाचा शोध घेण्यासाठी तर्कवितर्क लावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात अनेकांनी प्रत्युषाच्या प्रियकरावर म्हणजेच राहुल राज सिंगवर तिच्या आत्महत्येचा आरोप लावला होता. पण, या सर्व घटनेमागचा खरा सूत्रधार अद्यापही समोर आलेला नाही. प्रत्युषाने बिग बॉस या रिअॅलिटी शोसोबतच नच-बलियेच्या पाचव्या पर्वातही भाग घेतला होता.