बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही काळात ती सातत्याने सिनेसृष्टीतील घराणेशाही, टोळीबाजी, ड्रग्स रॅकेट, नव्या कलाकारांवर होणारा अन्याय या विरोधात आवाज उठवत आहे. तिच्या या रोखठोक शैलीमुळे अल्पावधीत लाखो नेटकरी तिला ट्विटवर फॉलो करु लागले. परंतु अचाकन गेल्या काही दिवसांपासून तिचे फॉलोअर्स कमी होऊ लागले आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे एका दिवसात सरासरी ४० ते ५० हजार नेटकरी तिला अनफॉलो करु लागले आहेत.

कंगनाने स्वत: ट्विट करुन याकडे ट्विटर इंडियाने लक्ष द्यावं अशी विनंती केली आहे. “माझे ट्विटर फॉलोअर्स गेल्या काही काळात सातत्याने कमी होत आहेत. यामध्ये एक पॅटर्न असल्याचा संशय मला येतोय. दिवसाला ४० ते ५० हजार फॉलोअर्स कमी होत आहेत. मी ट्विटरवर नवीन आहे. यामागचं कारण मला माहित नाही. हे असं का होतंय कोणी सांगेल का?” अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं आहे. हे ट्विट तिने ट्विटर इंडियाला देखील टॅग केलं आहे. कंगनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

कंगना सध्या सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्याने प्रतिक्रिया देत आहे. रिपब्लीक टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत तिने रिया चक्रवर्तीवर निशाणा साधला. ती म्हणाली, “रिया नक्कीच खोटं बोलतेय, आधी तिने सीबीआय चौकशी करा अशी मागणी केली नंतर सीबीआयने चौकशी करु नये म्हणून कोर्टात याचिका दाखल केली. तिनेच सुशांतला ड्रग्स वगैरे दिले आहेत. पण एवढं मोठं कारस्थान ती एकटी करु शकत नाही. तिच्या मागे नक्कीच कोणीतरी मास्टर माईंड आहे. कदाचित रियाने हे केवळ पैशांसाठी केलं असेल. आपल्याला रियासोबत त्या मास्टर माईंडचं देखील पितळ उघडं पाडायचं आहे.”