बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री कंगना रणावत आणि दीपिका पदुकोण या यशाच्या शिखरावर आहेत. दोघींचे अनुक्रमे ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ आणि ‘पीकू’ हे यावर्षातील यशस्वी चित्रपट. सध्या दिग्दर्शकांची चित्रपटासाठी पहिली पसंत असलेल्या या दोन अभिनेत्रींमध्ये मात्र ‘कोल्ड वॉर’ चालू आहे.
नुकताच कंगनाच्या आगामी कट्टी बट्टी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. त्यावेळी कंगनाला तिच्यातील आणि दीपिकामध्ये सुरु असलेल्या कोल्ड वॉरबद्दल विचारले असता ‘हे कट्टी बट्टीसारखं आहे’, असं तिचं उत्तर होत. गेल्या काही दिवसांतील कार्यक्रमांवर नजर टाकली तर या दोन आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये नक्कीच काहीतरी वाद असल्याचं चित्र दिसून येतं. काही दिवसांपूर्वी दीपिकाने ‘पीकू’च्या यशाबद्दल पार्टी दिली होती. या पार्टीला कंगना उपस्थित होती. पण, दोघींनी एकही फोटो एकत्र काढला नाही. तसेच, जेव्हा कंगनाने ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’च्या यशाची पार्टी दिली त्याला दीपिका उपस्थित नव्हती. दीपिकाच्या अनुपस्थिबाबत कंगनाला विचारले असता ती म्हणाली, मी दीपिकाला नेहमीच माझ्या आनंदात सामील होण्यासाठी आमंत्रण पाठवत आले आहे. मात्र, मला त्याचं कधीचं उत्तर मिळालं नाही. माझ्यासोबतच्या कलाकारांचं मी नेहमीचं समर्थन केलं आहे आणि पुढेही करेन. तशीचं वागणूक जर मलाही त्यांच्याकडून मिळाली तर मला आवडेल.
‘क्वीन’ चित्रपटासाठी कंगनाने गेल्यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी बहुतेक सर्वच पुरस्कार पटकावले. त्यावेळी एका पुरस्कार सोहळ्यात दीपिकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, जो तीने ‘क्वीन’ला समर्पित केला होता. त्यावेळेपासून, या दोघींमध्ये काहीतरी बिघडल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर कंगना म्हणाली होती की, चित्रपटसृष्टीतील माझे मित्रमंडळी तसेच, प्रियांका चोप्रा, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांनी माझे ‘क्वीन’साठी फोनवरुन अभिनंदन केले होते. मात्र, दीपिकाचा फोन आला नव्हता. कंगनाच्या या वक्तव्यानंतर दीपिकाने पुढाकार घेऊन कंगनाला फोन केला आणि त्यांच्यातील गैरसमज दूर केला. त्यामुळे या दोघींमध्ये खरचं कट्टी बट्टी होत असल्याचे दिसून येते.