मुंबई पोलिसांच्या ‘उमंग’ कार्यक्रमात अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रणौतच्या उपस्थितीमुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. दोघांमध्ये सुरु असलेल्या वादामुळे बऱ्याच कार्यक्रमात शक्यतो हे दोघे एकमेकांना टाळताना दिसतात. त्यामुळे या कार्यक्रमात दोघांच्या हजेरीमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या. हृतिक- कंगना प्रेमप्रकरण आणि त्यांच्यातील वाद हे जगजाहिर आहे. अशा वेळी कंगना हृतिकवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. करण जोहरच्या कार्यक्रमात हजेरी लावलेल्या कंगनाच्या वक्तव्यावरून याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली.

या कार्यक्रमात एका रोमॅण्टिक गाण्यावर डान्स केल्यानंतर कंगनाला तिच्या प्रेमकथेबद्दल विचारण्यात आले. यावर क्वीन कंगनाने तिच्याच अंदाजात खोचक उत्तर दिले. ‘मेरे इश्क के किस्से तो सारे न्यूजपेपर्स मे लिखे गए है,’ असा टोला लगावतानाच तिने लिहिलेल्या कवितेच्या दोन ओळीसुद्धा ऐकवल्या.

‘इश्क की आँखों मे खुदा देखा है हमने,
ना वो रोशनी थी ना अंधेरे,
ना जाने कौनसा मंजर देखा है हमने,’

वाचा : आक्षेपार्ह टिप्पणीमुळे सलमान खान, शिल्पा शेट्टीला समन्स 

या ओळी कंगनाने म्हणून दाखवल्या. बेधडकपणे आपली मतं मांडणाऱ्या कंगनाचा दिलखुलास अंदाज पुन्हा एकदा या कार्यक्रमात पाहायला मिळाला. लग्नाविषयीच्या प्रश्नावर ती म्हणाली की, ‘मुलींनी ३०व्या वर्षापर्यंत लग्न केले पाहिजे, असा समज आपल्या समाजात का आहे, हे मला आतापर्यंत कळाले नाही. इतक्यात लग्न करण्याचा माझा काही विचार नाही.’ बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावरून करण आणि कंगनामध्ये वाद झाला होता. त्यानंतरही करणच्या शोमध्ये अतिथी परीक्षक म्हणून कंगना उपस्थित राहिली.