गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. तिने या कार्यक्रमात हृतिक रोशन आणि आदित्य पांचोली यांच्यासोबत असलेल्या नातेसंबंधांवर भाष्य केले आणि सिनेसृष्टीतील अनेक गुपिते उघड केली.

कंगनाने या कार्यक्रमादरम्यान २०१४ मध्ये तिच्यात आणि हृतिकमध्ये ब्रेकअप झाल्याचे स्पष्ट केले. तेव्हा हृतिक मनालीमध्ये एका सिनेमाचे चित्रीकरण करत होता. तेव्हा त्या सिनेमातील अभिनेत्रीसोबत त्याचे अफेअर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. याबद्दल बोलताना कंगना म्हणाली की, मी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी हृतिकला फोन केला होता. त्यावेळी तू मला आज फोन का नाही केलास? असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, मी तुला फोन का करायचा? तेव्हा मी त्याला व्हॅलेंटाईन डे ची आठवण करून दिली. तेव्हाही हृतिकने रूक्षपणे मला उत्तर दिले. तेव्हा तू मला फोन का नाही करणार? कारण मी तुझ्याशी लग्न करणार आहे असा प्रतिप्रश्न तिने त्याला केला. यावर त्याने लग्न वैगेरे सगळे विसरून जा असा सल्ला त्याने दिला. याशिवाय तू आणखी कुणाला आपल्या नात्याबद्दल सांगितले असा प्रश्नही त्याने विचारला.

बॉबी डार्लिंगने केली पती विरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार

हृतिक तेव्हा कतरिना कैफसोबत बँग- बँग सिनेमाचे चित्रीकरण करत होता आणि कंगनाचा इशारा हा कतरिनाकडेच होता. हृतिक- कतरिनाने मनालीमध्ये ज्या पुलावर चित्रीकरण केले त्या पूलाचे नाव आता बँग- बँग पूल असे ठेवण्यात आले आहे.

कंगनाने सांगितले की, तिचे आणि आदित्य पांचोलीचे जवळपास ३ वर्षांचे नाते होते. आदित्य तिला मारायचा. त्याच्याकडे कंगनाच्या घराची चावीही होती. त्याच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ती घरातून पळून हॉटेलमध्ये राहायला गेली होती. पण आदित्य तिथेही पोहोचला होता. या काळात अनुराग बासूने तिची मदत केली होती. अनुरागने १५ दिवसांपर्यंत तिला आपल्या ऑफिसमध्ये लपवले होते. यानंतर कंगना पोलिसांकडे गेली होती.

तसेच पुरस्कारांबद्दल भाष्य करताना तिने म्हटले की, ‘हे सोहळे फारच बोगस असतात. तुम्हीही ते पाहण्यात स्वतःचा वेळ घालवू नका. सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्यांचा स्वतःचा असा ग्रुप असतो. तेच गाण्यांवर परफॉर्म करतात आणि त्याबदल्यात त्यांना पुरस्कार दिले जातात. अशाच प्रकारची सोयीस्कर देवाण-घेवाण या सोहळ्यांमध्ये होत असते.’