करिअर घडवताना आलेलं यश-अपयश बाजूला सारुन अभिनेत्री कंगना रणौतने तिचा मोर्चा आगामी चित्रपटांकडे वळविला आहे. लवकरच तिचा आगामी ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कंगनाने तिच्यातील आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यात असलेलं साम्य सांगितलं आहे. एका कार्यक्रमामध्ये ती बोलत होती.

‘झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची शैर्यगाथा साऱ्यांनाच ठाऊक आहे. देशासाठी, येथील जनतेसाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केला. त्यांना कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळाली नाही. त्यांच्याप्रमाणेच माझंही आयुष्य थोडंफार तसंच आहे. मला कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही. करिअर घडवितांनाही प्रचंड अडथळे आले’, असं कंगना म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, ‘आम्हा दोघींना जीवनात न्यायासाठी, हक्कासाठी संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे जीवनातील संघर्ष हा आमच्या दोघींमधील साम्य आहे’.

दरम्यान, या चित्रपटामध्ये कंगनाव्यतिरिक्त अतुल कुलकर्णी, वैभव तत्ववादी, अंकिता लोखंडे हे प्रसिद्ध चेहरेही पाहता येणार आहेत. या चित्रपटाच्यानिमित्ताने रुपेरी पडद्यावर मर्दानी झाशीच्या राणीचे धाडसी रुप पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.