अभिनेत्री कंगना राणौत हिच्यासाठी आगामी दोन वर्षे खूपच व्यग्र असणार आहे. ‘पंगा’, ‘मेंटल है क्या’, ‘तनू वेड्स मनू ३’ आणि जयललिता यांचा बायोपिक असे चार चित्रपट सध्या तिच्या पदरात आहेत. याव्यतिरिक्त कंगना तिचा बायोपिकही काढणार आहे. हे सर्व चित्रपट २०१९ – २० वर्षांत प्रदर्शित होणार आहेत. चित्रपटांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे कंगनानं अनुराग कश्यप यांच्या ‘इमली’ चित्रपटातून काढता पाय घेतला आहे.

नोव्हेंबर २०१८ मध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणं अपेक्षित होतं. मात्र कंगना ‘मणिकर्णिका’च्या दिग्दर्शनात व्यग्र असल्यानं ‘इमली’चं चित्रीकरण पुढे ढकललं. कंगनानं ‘पंगा’ आणि ‘इमली’ या दोन्ही चित्रपटांची घोषणा एकत्र केली होती. मात्र ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’मुळे तिला ‘इमली’ साठी वेळ देता आला नाही. चित्रपटाच्या चित्रीकरणाला खूपच दिरंगाई होत असल्यानं तिनं या प्रोजेक्टमधून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे.

‘काळजावर दगड ठेवून मी हा निर्णय घेतला आहे. अनुराग कश्यप हे माझे मार्गदर्शक आहेत. गॅगस्टरमध्ये त्यांनी मला काम करण्याची संधी दिली होती. इमलीमधून मला त्यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळणार होती. मात्र काहीवेळा मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात’ अशी प्रतिक्रिया कंगनानं व्यक्त केली आहे.
‘इमली’ या चित्रपटाची कथा खूपच चांगली आहे. मात्र भविष्यात संधी मिळाली तर नक्की काम करेल असा विश्वास तिनं व्यक्त केला आहे.