अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून अभिनेत्री कंगना रनौत बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आणि वादात राहिली आहे. विशेषत: मुंबईत शिवसेनेला तिनं केलेल्या उघड विरोधामुळे ती महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात देखील चर्चेत आली. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही सेलिब्रिटी मंडळींविरोधात कंगनाने केलेले काही ट्वीट्स तिच्यासाठी कायदेशीर अडचण निर्माण करणारे ठरले असून यासंदर्भात तिच्याविरोधात मुंबईतल्या वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये याचिका दाखल झाल्या आहेत. मात्र, या याचिकांसंदर्भात आता कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.

 

काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध संगीतकार जावेद अख्तर यांच्यासंदर्भात कंगनानं एका मुलाखतीमध्ये आक्षेपार्ह विधान केलं होतं. ह्रतिक रोशन प्रकरणासंदर्भात जावेद अख्तर यांनी “रोशन कुटुंबीयांसोबत वाद ओढवून घेतलास, तर ते तुला जेलमध्ये टाकतील”, अशा शब्दांत आपल्यावर दबाव टाकल्याचं कंगना म्हणाली होती. मात्र, जावेद अख्तर यांनी हा आरोप फेटाळून लावत कंगनावरच मानहानीची तक्रार दाखल केली होती. अंधेरी न्यायदंडाधिकाऱ्यांनी याबाबत कंगनाविरोधात जामीनपात्र वॉरंट देखील जारी केलं होतं. त्यासोबतच, कंगना रनौतनं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत केलेल्या ट्वीटसंदर्भात देखील तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आपल्याविरोधात मुंबईच्या न्यायालयांमध्ये दाखल असलेले सर्व खटले मुंबईहून शिमला न्यायालयात वर्ग करण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेमध्ये मुंबईत शिवसेनेकडून आपल्याला धोका असल्यामुळेच आपण ही मागणी करत असल्याचं कंगनानं नमूद केल्याचं सांगितलं जात आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. शिवसेनेच्या भितीमुळेच कंगनानं सर्व खटले शिमला कोर्टात वर्ग करण्याची मागणी केल्याचं कंगनाने आपल्या याचिकेमध्ये नमूद केलं आहे.