बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नु आणि बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रनौत यांच्यांतील ट्विटरवरील युद्ध आपण पाहतच आहोत. अलीकडेच, तापसीला ‘थप्पड’ या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार घेताना, तापसीने तिच्या भाषणात बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींचे आभार मानले. ज्यामध्ये तिने कंगना रनौतचे नाव देखील घेतले आहे. तर त्यावर कंगनाने दिलेले उत्तर पाहता या दोघांनी त्यांच्यातील वाद संपवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. हा व्हिडीओ एक नेटकऱ्याने ट्विटरवर कंगनाला टॅग करत शेअर केला आहे. या व्हिडीओत तापसीला फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्यानंतर तिने तिच्या भाषणात कंगनाचे आभार मानल्याचे दिसत आहे. "आम्हाला सगळ्यांना आणखी मेहनत करायला भाग पाडण्यासाठी कंगना तुझे आभार. तुझ्या अभिनयाची उंची दिवसेंदिवस अशीच वाढत राहो",असे तापसी त्या व्हिडीओमध्ये म्हणाली. तापसीने कौतुक केल्यानंतर कंगनाने तिला उत्तर दिले आहे. "धन्यवाद तापसी, तू विमल फिल्मफेअर अवॉर्डसाठी पात्र आहेस. यावर तुझ्या इतका दुसऱ्या कोणाचा हक्क नाही,"असे ट्विट कंगनाने केले आहे. Thank you @taapsee well deserved Vimal elaichi filmfare award.. no one deserves it more than you — Kangana Ranaut (@KanganaTeam) April 9, 2021 कंगनाच्या या ट्विटनंतर या दोघांनमध्ये पुन्हा एकदा मैत्री झाली का?, आता या दोघी त्यांच्यात झालेली भांडण विसरूण जातील का? असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत. तर दुसरीकडे काही नेटकरी कंगनाने ट्विट करत तापसीची स्तुती नाही तर तिला टोला लगावला असे म्हणत आहेत. नक्की काय खरं आणि काय खोटं हे फक्त कंगना सांगु शकते. कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपटात २३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रदर्शनाची तारीख ही पुढे ढकलण्यात आली आहे. तर, तापसी तिच्या आगामी चित्रपट ‘शाब्बास मिट्टू’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या संघर्षावर आधारीत आहे.