राणी मुखर्जी, अभिताभ बच्चन यांचा २००५ साली आलेला ‘ब्लॅक’ चित्रपट खूपच गाजला. राणी मुखर्जीच्या करिअरमधला हा सर्वोत्तम अभिनय होता अशा शब्दात तिचं कौतुक करण्यात आलं होतं. त्या वर्षांतले सर्व मानाचे पुरस्कार राणीला मिळाले होते. १० वर्षांहूनही अधिक काळ लोटला तरी राणीने साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांना अजूनही तितकीच लक्षात आहे. मात्र कंगनाला राणीच्या भूमिकेचं तेव्हा फारसं अप्रुप वाटलं नव्हतं.

राणीनं जो अभिनय केला त्यात नवल असं काहीच नाही. तिने जो अभिनय केला त्याच तोडीचा अभिनय मी देखील करू शकते असा आत्मविश्वास कंगनाने तिच्या स्ट्रगलिंगच्या काळात व्यक्त केला होता. याचा एक किस्सा तिनं नुकताच एका मुलाखतीत सांगितला. ‘त्यावेळी मी रंगभूमीवर काम करत होते. त्या काळात राणीचा ब्लॅक चित्रपट प्रदर्शित झाला होता. आम्हा सर्व मुलांमध्ये ‘ब्लॅक’चीच चर्चा होती. आपल्यालाही असा अभिनय जमला असता तर आपणही कलाकार होऊ शकलो असतो असेही ते मला म्हणाले’, कंगनाने मुलाखतीत हा किस्सा सांगितला.

‘त्यात काय तिच्यासारखा अभिनय मीही करू शकते असा विश्वास त्यावेळी मी व्यक्त केला होता. माझ्या या प्रतिक्रियेवर सर्वच् अवाक् झाले होते.  त्यादिवशी मी हॉस्टेलवर परतले, मी राणीसारखा अभिनय करू शकते याची मला खात्री होती. मी आरशात न पाहता अभिनय करून पाहिला,  त्यादिवशी पहिल्यांदा मला आत्मविश्वास मिळाला’ असं कंगना म्हणाली.