अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या सडेतोड वक्तव्य आणि बोचऱ्या मतांसाठी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. तिच्या टीकेची तोफ कधी कोणावर डागेल हे सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी कंगनाने अभिनेत्री आलिया भट्टवर ताशेरे ओढले होते. त्यावर आलियाने ‘लोकं काही बोलू देत मी लक्ष देणार नाही. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यांचे बोलण्याचे मी वाईट वाटून घेणार नाही. मी शांत बसणार’ असे आलिया म्हणाली होती.

आलियाचे हे अत्यंत शालीनतेचे उत्तर पाहून रंगोलीने त्यावर प्रत्युत्तर दिले आहे. ‘लोक वेडे नाहीत. कोण एकटं उभं आणि मूव्ही माफियावाले कुठे आहेत हे त्यांना दिसतं. सध्याच्या प्रामाणिक आणि पारदर्शक जगात तुझे ‘मै चुप रहूँगी’सारखे मध्ययुगीन विचार तुझ्याकडेच ठेव. दरदिवशी ते व्हायरल करायची गरज नाही’ असे ती म्हणाली. त्यानंतर आलिया चित्रपटात काम करण्यासाठी प्रत्येक चित्रपट निर्मात्याकडे विनवणी करत असल्याचेही रंगोलीने म्हटले आहे.

‘दुसऱ्यांची कामे आणि संधी हिरावून घेणे, कामासाठी चित्रपट निर्मात्यांकडे विनवणी करणे, चित्रपट मिळवण्यासाठी डाव रचणे किंवा ओळखीचा वापर करणे आणि सगळ्यांसमोर सोज्वळतेचे ढोंग करुन लोकांना मुर्ख बनवणे’ अशी टीका रंगोनीले आलियावर ट्विटरव्दारे केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका वेबसाइटने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी पोल घेतला. या पोलमध्ये कंगनाला ३७ टक्के तर आलियाला ३३ टक्के मते मिळाली. यावर कंगनाची प्रतिक्रिया विचारली होती. यावर कंगनाने ‘मला खरंच लाज वाटतेय. ‘गली बॉय’च्या परफॉर्मन्समध्ये टक्कर देण्यासारखे आहे तरी काय? तीच फटकळ मुलगी.. बॉलिवूडच्या पठडीत बसणारी बिनधास्त तरुणी.. महिला सशक्तीकरण आणि उत्तम अभिनय.. कृपा करून मला या सगळ्यांपासून दूर ठेवा. प्रसारमाध्यमांनी या फिल्मी मुलांना खूप डोक्यावर उचलून घेतलय. सुमार दर्जाच्या कामगिरीचं कौतुक करणे थांबवा, अन्यथा आपला दर्जाच कधी त्याहून वर नाही जाणार,’ असे उत्तर दिले होते. तेव्हापासून कंगना आणि आलियामध्ये शीतयुद्ध सुरु झाले आहे.