अभिनेत्री कंगना रणौतचा मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून कंगनाने पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं. कंगनाचा हा प्रयत्न यशस्वीही ठरला. या चित्रपटाने आतापर्यंत ७६.६५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात कंगनाने झांशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका वठविली असून सध्या चित्रपटाच्या यशासोबतच नवे वादही निर्माण झाले आहेत. मणिकर्णिकाचे सहदिग्दर्शक क्रिश आणि कंगना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतानाच कंगनाने आता तिची तोफ बॉलिवूड सेलिब्रिटींकडे वळविली आहे.

‘सध्या बॉलिवूडमधील सारी सेलिब्रिटी मंडळ माझ्याविरोधात एकत्र आले आहेत. मी पहिल्यांदाच दिग्दर्शनाचं धनुष्य उचललं आणि ते लिलया पेललही. त्यामुळे माझ्यावर सध्या सर्व स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र कालविश्वतील एकाही कलाकाराने माझी कौतुकाने पाठ थोपटली नाही. आमिर खान, ट्विंकल खन्ना, आलिया साऱ्यांच्या यशाचं मी कौतुक केलं होतं. मात्र माझ्या आनंदात हे कोणीच सहभागी झाले नाहीत’, असं कंगना म्हणाली.

‘इंडस्ट्रीने कायमच माझ्याकडे दुर्लक्ष केलं. माझ्या चित्रपटाच्या ट्रायलमध्ये कोणताही कलाकार बोलवल्यानंतरही येत नाही. मात्र त्यांच्या चित्रपटाचं ट्रायल असेल तेव्हा हेच कलाकार मला आवर्जुन फोन करुन बोलवतात. त्यामुळे आता मीदेखील त्यांच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला जाणं सोडून दिलं आहे. आमिर खानने त्याच्या ‘दंगल’ आणि ‘सीक्रेट सुपरस्टार’ या दोन्ही चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी बोलावलं होतं. यावेळी त्याने मोठ्या आपुलकीने माझ्याशी गप्पा मारल्या होत्या. मात्र ‘मणिकर्णिका’सारखा ऐतिहासिक संदर्भ असलेल्या चित्रपटावर त्यांची साध्या एका ओळीचीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे आता मला एक समजलं आहे हे सारे संधीसाधू लोक आहेत,’असे कंगना म्हणाली.