हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये बऱ्याच कलाकारांच्या गर्दीत कंगना रणौतने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच बळावर ती यशाच्या शिखरावर आहे. पण जो यशाच्या शिखरावर असतो त्याला अपयशाचा देखील सामना करावाच लागतो. कंगनाला त्याचा नुकताच अनुभव आला. शाहिद कपूर आणि सैफ यांच्यासोबतच्या तिच्या ‘रंगून’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. मात्र, अपयशावर मात करुन ती आता पुन्हा यशासाठी सज्ज झाली आहे. कंगना रणौत आगामी ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटात ती राणी लक्ष्मीबाईंच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी सध्या कंगना फारच मेहनत घेत आहे. कंगनाने चित्रपटातील भूमिकेसाठी घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. कंगना रणौतचा आगामी चित्रपट केतन मेहता दिग्दर्शित करत आहे.

‘रंगून’ चित्रपटाच्या अपयशानंतर कंगना आगामी चित्रपटाकडून नक्कीच अपेक्षा असतील. ‘रंगून’ चित्रपटाला आलेल्या अपयशाबद्दल कंगना म्हणाली होती की, मला कधीही काही गमावण्याची भीती वाटत नाही. कामामधील सातत्यातून पुढे जाण्यावर मी विश्वास ठेवते. तुम्ही पुढे न जाता थांबलात तर तुम्ही पराभूत होता.” अर्थात कंगनाने केलेले विधान ती आता प्रत्यक्षात साकारण्याची तयारी करत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बॉलिवूडमधील चित्रपटासोबतच कंगना अनेक कारणांनी चर्चेत असते. ह्रतिक रोशनसोबतच्या वादानंतर तिचा चक्क बॉलिवूडमधील दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर सोबतच्या वादाची चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. रंगून चित्रपटावेळी देखील शाहिद कपूरसोबत तिचे बिनसल्याचे पाहायला मिळाले होते.

कंगना रणौतने आतापर्यंत तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून आपल्यातील अभिनय सिद्ध केला आहे. ‘फॅशन’ तर ‘क्वीन’ आणि ‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटातील अभिनयासाठी कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब मिळाला आहे. तिच्या यशापासून ते ‘रंगून’च्या अपयशापर्यंत तिने तिच्या स्वभावात कोणताच बदल केलेला नाही. ती नेहमीच तिच्या बिनधास्त अंदाजात वावरताना दिसली आहे.