दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारावर भाष्य करणं अभिनेत्री कंगना रणौतला महागात पडलं आहे. शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ६ मोठ्या ब्रॅण्डने तिच्यासोबतचा करार रद्द केला आहे. याविषयी कंगनाने ट्विट करुन माहिती दिली आहे.

२६ जानेवारीला दिल्लीत प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान मोठा हिंसाचार झाला. याप्रकरणावर कंगनाने एक व्हिडीओ शेअर करत शेतकऱ्यांवर टीका केली होती. स्वतःला शेतकरी म्हणवून घेणारे दहशतवादी आहेत, त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना तुरुंगात टाका असं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. कंगनाचा हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं आणि टीकास्त्र डागलं. यामध्येच आता सहा दिग्गज ब्रँण्डने तिच्यासोबतचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं आहे.

आणखी वाचा- ट्रॅक्टर मोर्चा : दिल्लीच्या रस्त्यांवर हिंसा करणारे घुसखोर होते; ४० शेतकरी संघटनांचा दावा


“तुम्ही शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्यामुळे आता आम्ही तुम्हाला बँण्ड अॅम्बेसेडर( सदिच्छादूत) करु शकत नाही. पण, आता मी त्यांना सांगू इच्छित आहे की, जे आज झालल्या हिंसेला पाठिंबा देत आहेत, ते सुद्धा दहशतवादी आहेत”, असं ट्विट कंगनाने केलं आहे.

दरम्यान, कंगना सध्या तिच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. हे चित्रीकरण सुरु असताना भोपाळमध्ये तिला एका आंदोलनाचा सामना करावा लागला. चित्रीकरण सुरु असताना एका राजकीय गटाने कंगनाला विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली होती. या चित्रपटाचं चित्रीकरण भोपाळमध्ये होऊ नये, कंगनाने भोपाळमधून निघून जावं अशी मागणी या आंदोलकांनी केली होती.