राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रणौत हिने नुकताचं ती तिच्या कुटुंबाला नको असलेले अपत्य असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर आता कंगनाच्या वडिलांनी आपल्या गावात मुलींच्या जन्माबाबत असलेल्या मागासलेल्या विचारांबद्दल मौन सोडले आहे. कंगनाचा जन्म हा आमच्या घरात आनंदाचा क्षण नव्हता, असे ते म्हणाले. हिमाचल प्रदेश येथे राहत असलेले अमरदीप रणौत यांनी कंगनाने नुकत्याच केलेल्या विधानावर आपले मत मांडले. आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, कंगनाचा जन्म झाला त्यावेळी आमच्या गावातील वातावरण अतिशय मागास होते. मुलींचा जन्म म्हणजे त्यावेळी दुःखद घटना समजली जात असे. कंगनाच्या जन्मानंतर सगळे गावकरी आमच्या घरी जमा झाले आणि म्हणाले, पुन्हा एकदा मुलगी झाली. त्यामुळे आम्ही तिच्या जन्माचा आनंदच साजरा केला नाही. पहिल्या मुलाच्या मृत्यूनंतर आम्हाला यावेळी तरी मुलगा होईल अशी आमची अपेक्षा होती, असे अमरदीप म्हणाले. कंगनाला रंगोली ही मोठी बहिण आहे. या दोघींना एक मोठा भाऊदेखील होता. पण जन्माच्या दहा दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला होता. रंगोलीच्या जन्मावेळी घरातल्यांनी आनंद साजरा केलेला. मात्र, कंगनाच्या जन्मानंतर दुःख व्यक्त करण्यात आले होते, असा खुलासा कंगनाने काही दिवसांपूर्वी केला होता.