अभिनेते मुकेश खन्ना यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट लिहित ‘द कपिल शर्मा शो’वर टीका केली होती. त्या टीकांवर अखेर कपिलने मौन सोडलं आहे. कपिलच्या शोमध्ये दुहेरी अर्थांच्या विनोदांचा भडीमार होत असून हा शो अश्लिलतेकडे झुकणारा असल्याची टीका मुकेश खन्नांनी केली होती. ‘महाभारत’ या मालिकेची संपूर्ण टीम कपिल शर्माच्या शोमध्ये उपस्थित राहिली होती. पण त्यावेळी मुकेश खन्ना मात्र हजर नव्हते.

मुकेश खन्नांच्या टीकांवर कपिल म्हणाला, “सध्याच्या करोनाच्या काळात मी आणि माझी टीम लोकांना हसवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. संपूर्ण जग इतक्या अवघड काळातून जात असताना लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टीत आनंद शोधायचा आहे आणि कोणत्या गोष्टीतून उणिवा शोधून काढायच्या आहेत हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. मी माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे आणि पुढेही तेच करेन.”

काय होतं मुकेश खन्ना यांचं ट्विट-

द कपिल शर्मा शो हा जरी संपूर्ण देशात लोकप्रिय असला तरी मला यापेक्षा वाईट कोणताही शो वाटत नाही. या शोमध्ये दुहेरी अर्थांचे विनोद असतात, पुरुषांना महिलांचे कपडे परिधान करायला देतात आणि लोक पोट धरुन हसतात, अशा आशयाचं ट्विट करत त्यांनी टीका केली होती.