सध्या अभिनेता, दिग्दर्शक करण जोहर इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नसाठी ऑस्ट्रेलियाला गेला आहे. दरम्यान त्याने भारतीय स्वातंत्र्य दिनापूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये भारताचा राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे.

झेंडा वंदनासाठी करण जोहरने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे. त्याचा हा ड्रेस बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध ड्रेस डिझायनर जोडी शंतनु आणि निखिलने डिझाइन केला आहे. करणने भारताचा राष्ट्रध्वज फडकवत राष्ट्रगीत म्हटले आहे. त्यानंतर करणने भाषणदेखील केले आहे. ‘मेलबर्नसारख्या शहरात स्वातंत्र्य दिवस साजरा करायला मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्टी आहे. दुसऱ्या देशात येऊन स्वत:च्या देशाचे प्रतिनीधीत्व करायला मिळणे ही खूप आनंदाचीबाब आहे आणि इकडे येऊन आपल्या देशाचा झेंडा फडकवणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे’ असे करण जोहर भाषणामध्ये म्हणाला. करणचा हा व्हिडीओ विनोद आर सिंगने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या फेस्टिवलमध्ये करण जोहरचा सुपरहिट चित्रपट ‘कुछ कुछ होता है’चे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आले आहे. करण व्यतिरिक्त या फेस्टिवलमध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुख, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, तब्बू आणि जोया अख्तरदेखील पोहोचले आहेत. शाहरुखला या फेस्टिवलमध्ये ‘एक्सलन्स ऑफ सिनेमा’ हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर दुसरीकडे ‘गली बॉय’ या चित्रपटाला सर्वोत्तकृष्ट सिनेमा हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच ‘अंधाधून’ चित्रपटासाठी श्रीराम राधवन यांनादेखील पुरस्कार मिळाला आहे. हे फेस्टिवल ८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. दरम्यान येथे २२ हून अधिक भाषांमधील ६० चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.