बॉलिवूड निर्माता करण जोहर नेहमीच चर्चेमध्ये असतो. सध्या 'कॉफी विथ करण' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या व्यासपीठीवर बोलवून बॉलिवूड सेलिब्रिटींची तो गिरकी घेताना दिसत आहे. दरम्यान पाकिस्तानी कलाकारांसोबतच्या चित्रपटामुळे चर्चेत आलेला करण त्याच्या आत्मचरित्रामुळेही चर्चेत आला आहे. करणने 'अन सुटेबल बॉय' या आत्मचरित्रामध्ये काजोल आणि त्याच्यातील मैत्रीचाउल्लेख केला आहे. काजोलने आपली साथ सोडली असे करणने म्हटले आहे. त्यामुळे आत्मचरित्रातील काजोलच्या प्रकरणामुळे करण सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. अजय-देवगण आणि काजोल यांच्या निकटवर्तीयांनी करणवर गंभीर आरोप केल्याची चर्चा सध्या बॉलिवूड वर्तुळात रंगल्याचे दिसते. करणने पुस्तकाच्या खपासाठी काजोलचा उल्लेख केल्याचा आरोप करणवर करण्यात येतोय. करण लोकांच्या समोर एक आणि पाठीमागे एक वक्तव्य करत असल्याची चर्चा तशी नवी नाही. करणच्या या स्वभावाचा शाहरुखने देखील अनुभव घेतला आहे. काही दिवसांपूर्वी करणने प्रियांकावर केलेल्या टीप्पणीवर शाहरुखने नाराजी व्यक्त केली होती. बॉलिवूडचा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री काजोल यांच्यातील मैत्रीमध्ये दरी निर्माण झाल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली आहे. त्यातच करणने आत्मचरित्रामध्ये काजोलचा उल्लेख केल्यामुळे दोघांच्यातील नाते पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनल्याचे दिसते. करणने आत्मचरित्रामध्ये काजोलसोबतच्या नात्यावर लिहिताना म्हटले की, 'आता सर्व संपले आहे. ती माझ्या आयुष्यात कधीच परत येणार नाही. मला वाटते तिलाही हेच हवे आहे.' तसेच करण पुढे म्हणाला की, 'एका वेळी ती माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती, पण तिने माझ्या २५ वर्षाच्या मैत्रीकडे पाठ फिरवली आहे.' ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’ अशा विविध चित्रपटांच्या माध्यमातून काजोलने करणसोबत काम केले आहे. त्यांच्या मैत्रीची चर्चाही सर्वदूर सुरुच असते. कोणत्याही चित्रपटाच्या निर्मितीवेळी काजोल ही करणची पहिली पसंती असायची. पण, सध्या मात्र या दोघांच्या मैत्रीला गालबोट लागल्याचे दिसते. मैत्रीचा वापर करणने आपल्या पुस्तकाला खप मिळवून दिल्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. या वृत्ताला करण किंवा अजय आणि काजोल यांच्यापैकी कोणीच दुजोरा दिलेला नाही.