बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. सिनेसृष्टीतील घराणेशाहीसाठी निर्माता करण जौहरला जबाबदार धरले जात आहे. त्याच्यावर सोशल मीडियाद्वारे तुफान टीका केली जात आहे. या टीकाकारांपासून वाचण्यासाठी त्याने स्वत:चा फोन नंबर बदलला. तसेच बॉलिवूडमधील आपल्या मित्रमंडळींना त्याने अनफॉलो केलं आहे.

करण जौहर आपल्या ट्विटर अकाउंटवर १०८ कलाकारांना फॉलो करत होता. यामध्ये आलिया भट्ट, वरुण धवन, दीपिका पादूकोण, अर्जुन कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा असे कलाकार होते. विशेष म्हणजे यांपैकी अनेक कलाकारांवर घराणेशाहीचा आरोप केला जातो. यापैकी अनेकांना स्वत: करणनेच लॉन्च केले होते. मात्र या सर्वांना आता त्याने अनफॉलो केलं आहे. आता केवळ तो अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार अशा आठच कलाकारांना फॉलो करत आहे.

करण जौहरची ही कृती सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. मात्र याने विरोधकांवर फारसा प्रभाव पडलेला नाही. त्यांनी आपला विरोध आणखी तीव्र केला आहे. अलिकडेच करण जौहर व सलमान खान विरोधात एक ऑनलाईन पिटिशन जारी करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे यावर दोन दिवसांत तब्बल २९ लाख लोकांनी सह्या केल्या. यावरुन लोकांच्या मनातील करण विरोधातील राग दिसून येत आहे.