दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कभी खूशी कभी गम’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर काही वेगळीच जादू केली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, हृतिक रोशन, करिना कपूर आणि काजोल हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष गाजला होता. तसेच या चित्रपटामुळे सर्व कलाकरांच्या करिअरला एक वेगळेच वळण मिळाले होते. दरम्यान या चित्रपटातील गाण्यात बिग बींना पाहून करण जोहर बेशुद्ध झाला असल्याचा खुलासा करण जोहरने केला आहे.

‘कभी खूशी कभी गम’ या चित्रपटातील ‘बोले चूडिया’ या गाण्याने आज यूट्यूबवर ४०० मिलियन व्ह्यूज पार केले आहेत. दरम्यान करणने चित्रपटाबाबत ट्विट करत आठणींना उजाळा दिला आहे. अमिताभ यांना पहिल्यांदा पाहून करण जोहर बेशुद्ध झाला होता. ‘माझ्या करिअरमधील सर्वात अविस्मरणीय गाणे. मला पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांच्यासह काम करण्याची संधी मिळाली होती. मी त्यांना पाहून घाबरलो होतो. इतका घाबरलो की बेशुद्धच झालो होतो’ असे करणने ट्विटमध्ये लिहिले होते.

‘कभी खूशी कभी गम’ हा चित्रपट २००१मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरचे वडिल यश जोहर यांनी केली होती. या चित्रपटाला ५ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. आजही हा चित्रपट प्रेक्षक तितक्याच आनंदाने पाहत असून चित्रपटातील गाणी तितकीच लोकप्रिय आहेत.