प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्ज प्रकरणी एनसीबीनं अटक केली होती. काही तासांच्या चौकशीनंतर विशेष एनडीपएस न्यायालयाने या दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. दरम्यान या अटकेमुळे सध्या भारतीवर जोरदार टीका केली जात आहे. तिची खिल्ली उडवणारे मिम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सर्व टीकाकारांवर अभिनेता करणवीर बोहरा संतापला आहे. एखाद्याच्या टॅलेंटची तुम्ही खिल्ली कशी उडवू शकता? असा सवाल त्याने केला आहे. "थोडी तरी लाज बाळगा अन् एनसीबीला त्यांचं काम करु द्या. कोणाच्याही टॅलेंटची अशी खिल्ली उडवू नका. प्रचंड मेहनत आणि देवाच्या आशीर्वादानं भारतीने हे यश मिळवलं आहे." अशा आशयाचं ट्विट करुन करणवीरने भारतीला पाठिंबा देत टीकाकारांना सुनावलं आहे. या ट्विटसोबत त्याने भारतीवर तयार करण्यात आलेलं एक मिम्स देखील शेअर केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. Let the NCB do their job, and have some shame, don't speak about someone's talent like this, they have reached here with their own hardwork and gods blessings. #BhartiSinghwearewithyou #BhartiSingh — Karanvir Bohra (@KVBohra) November 21, 2020 अंमली पदार्थ विरोधी पथकाने कॉमेडियन भारती सिंहच्या घरावर शनिवारी छापा टाकला. त्यावेळी तिच्या घरात अंमली पदार्थ आढळून आल्यामुळे एनसीबीने शनिवारी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाने अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर या दोघांना मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयाने १४ दिवसांची म्हणजे ४ डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली. ज्यानंतर भारती आणि तिच्या पतीने जामिनासाठी अर्ज केला होता. जो मंजूर करण्यात आला असून दोघांनाचाही जामीन मंजूर झाला आहे.