राजकारणावर बेतलेल्या कारभारी लयभारी मालिकेने सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरुवात केली होती. "डोळ्यात जाळ हाय, दुश्मनाचा काळ हाय काळीज कापतंय नजरेची सूरी, आला आला कारभारी लयभारी.!" हे गाणं विशेष गाजलं. या मालिकेच्या निमित्ताने अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर आली. या मालिकेची कथा तेजपाल वाघ यांची असून ‘देवमाणूस’ या मालिकेचे संवाद लेखक विशाल कदम यांनी या मालिकेचे देखील संवाद लिहिले आहेत तर पटकथा स्वप्नील गांगुर्डे याची आहे. देशभरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव, महाराष्ट्रात लॉकडाउनचा निर्णय, लॉकडाउनच्या काळात अनेक गोष्टींवर आलेले निर्बंध, यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी, यामुळे ‘कारभारी लयभारी’ मालिकेने थोडा ब्रेक घेतला होता. पण आता ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. मालिकेत बऱ्याच घडामोडी घडताना दिसणार आहेत. काकी वीरु आणि त्याच्या आईला ज्या पद्धतीने वागवते ते पाहून पियू ठरवते की या घरात त्या दोघांना त्यांचा मान मिऴवून द्यायचा, राजवीरचे वडील जसे त्या गावचे कारभारी होते आणि त्यांचा पक्षात, राजकारणात आणि विरोधकांसमोर एक दरारा होता त्याच प्रमाणे राजवीरने सुद्धा गावच्या भल्यासाठी सक्रिय राजकारणात काम करावं यासाठी प्रियांका विशेष प्रयत्न करताना दिसणार आहे. पण सक्रिय राजकारणातला राजवीरचा हा प्रवेश त्याच्या जीवावर तर बेतणार नाही ना? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. चाहत्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे आगामी भागामध्ये मिळणार आहेत.