आज २१ सप्टेंबर रोजी बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करिना कपूर खानचा ३९ वा वाढदिवस आहे. करिना सर्वात स्टाइलिस्ट आणि यशस्वी अभिनेत्रींच्या यादीमधील एक आहे. वयाच्या २० व्या वर्षी करिनाने अभिनयाच्या दुनियेला सुरुवात केली. तिने २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेफ्यूजी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात करिनासोबत अभिनेता अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर करिनाने 'अशोका', 'कभी खुशी कभी गम', 'चमेली', 'ओमकारा', 'ऐतराज', 'हलचल', 'बेवफा', 'जब वी मेट', 'गोलमाल 3', '3 इडियट्स', 'बॉडीगार्ड', 'रा.वन', 'बजरंगी भाईजान', 'वी आर फॅमिली', 'कुर्बान', 'उड़ता पंजाब', 'वीरे दी वेडिंग' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. करिनाच्या चित्रपटांतील भूमिकांसोबतच तिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. तिचे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसह भांडण झाले होते. २००१ मध्ये करिनाचे अभिनेत्री बिपाशा बासूसोबत 'अजनबी' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कपड्यांवरुन भांडण झाले होते. त्यानंतर करिनाचे बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांकासोबतही भांडण झाले होते. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅटशोमध्ये करिनाने याचा खुलासा केला होता. करिनाचा 'गोलमाल २' आणि ऐश्वर्या राय बच्चनचा 'अॅक्शन रीप्ले' हा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाला होता. दरम्यान एका मुलाखतीमध्ये करिनाला ती ऐश्वर्याला टक्कर देण्यासाठी तयार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर करिनाने गोलमाल हा ब्रँड आहे. प्रेक्षक त्याला पहिली पसंती देणार असे वक्तव्य करत ऐश्वर्याला टोला मारला होता. तसेच करिनाचे अभिनेत्री अमिषा पटेलशी देखील भांडण झाले असल्याचे म्हटले जात आहे. 'कहो ना प्यार है' या चित्रपटामध्ये अमिषा पटेलपूर्वी करिनाची निवड करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव चित्रपट निर्मात्यांनी करिना ऐवजी आमिषाची निवड केली. तेव्हा पासून करिना आणि आमिषामध्ये कटूता निर्माण झाली होती.