अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा पती संजय कपूर यांच्या नात्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणाव निर्माण झाल्याची चर्चा होती. बरेच दिवस दोघांना एकत्र कुठेही पाहिले गेले नसल्याने करिश्मा कपूर आणि संजय कपूर एकमेकांपासून विभक्त झाल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत होते. करिश्मा कपूर गेल्या काही काळापासून आपल्या दोन मुलांसह माहेरी राहत आहे. त्यामुळे आता संजय कपूरने आपल्या मुलांचा ताबा मिळविण्यासाठी वांद्रे येथील कुटूंब न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगितले जात आहे. करिश्मा आणि संजय यांच्या एकमेकांविरोधातील भावना तीव्र असल्या तरी आपल्या घटस्फोटाविषयी किंवा मुलांचा ताबा मिळविण्यासंदर्भातील याचिकेविषयी बाहेर कुठेही वाच्यता होणार नाही याची दोघांकडून खबरदारी घेतली जात आहे. या दोघांच्या वकिलांनीसुद्धा खटल्याच्या माहितीबद्दल कमालीची गुप्तता बाळगली आहे. संजय आणि करिश्मा कपूर यांचा २००३ साली विवाह झाला होता. त्यानंतर २००५मध्ये त्यांची मुलगी समायरा आणि २०१०मध्ये मुलगा किआनचा जन्म झाला होता.