एकता कपूरच्या ‘क’ मालिकांची चलती सुरू असताना तिची ‘कसौटी जिंदगी की’ ही मालिका खूप गाजली होती. २००१ ते २००८ अशी दीर्घकाळ ही मालिका चालली. आता दहा वर्षांनी या मालिकेचा सीक्वेल येणार आहे. एकता कपूरने मालिकेच्या प्रसिद्धीसाठी थेट ‘किंग खान’ अर्थात शाहरुख खानला गळ घातली आणि मालिकेच्या प्रोमोजमधून खुद्द शाहरुखने मालिकेची आणि त्यातील कलाकारांची प्रसिद्धी केली आहे. या प्रसिद्धीसाठी शाहरुखने आठ कोटी रुपये घेतल्याची चर्चा आहे.

दहा वर्षांनी या मालिकेचा सीक्वेल आणताना एक नवीन पिढी तिच्या समोर आहे. या पिढीला त्यांच्या पद्धतीने मालिकेशी जोडून घ्यावे लागणार असल्याने एकताने या मोहिमेत शाहरुखला बरोबर घेतले. एकता आणि शाहरुख या दोघांनी एकत्र प्रोमो केला आहे. ‘कसौटीजिंदगी की’ मालिका दुसऱ्या पर्वात प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची घोषणा त्यांनी केली. मालिकेच्या नव्या पर्वात एरिका फर्नाडिस ‘प्रेरणा’ या भूमिकेत, तर ‘अनुराग’च्या भूमिकेत पार्थ समाथान असणार आहे. हा प्रोमो प्रदर्शित झाला त्या दिवशी ‘ट्विटर’वर पहिल्या क्रमांकावर होता. अन्य समाजमाध्यमांवरही तो लोकप्रिय ठरला आहे. मालिकेच्या नव्या पर्वात शाहरुख खान काम करणार असल्याची चर्चा रंगली होती. शाहरुखने या ‘प्रेरणा’ आणि ‘अनुराग’ची ओळख करून दिली असल्याने तो नव्या पर्वातील प्रेमकथेचा निवेदक असणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र याबाबतीत कोणतीही अधिकृत घोषणा एकता क पूरने केलेली नाही. संगीतकार, गायक बाबुल सुप्रियो नव्याने या मालिकेचं शीर्षकगीत ध्वनिमुद्रित करणार आहे.

एकता कपूरने तिच्या या मालिकेसाठी सगळ्या गोष्टी सुंदर जुळवून आणल्या आहेत. त्यामुळे प्रेमकथा सादर करण्यासाठी प्रेमपटांचा बादशहा शाहरुखलाच तिने आमंत्रित केले आहे. पहिल्या भागाची सुरुवात शाहरुख कशी करतो, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. यानिमित्ताने प्रेमकथा आणि शाहरुख हे खास नातं छोटय़ा पडद्यावरही अधोरेखित झालं आहे.