दिग्दर्शक रोहित शेट्टीविरोधात सोशल मीडियावर ट्रेंड सुरु झाल्यानंतर अभिनेत्री कतरिना कैफ त्याच्या मदतीला धावली आहे. रोहित शेट्टीने सुर्यवंशी चित्रपटाच्या शेवटच्या सीनसंबंधी बोलताना म्हटलं होतं की, कोणाचंही लक्ष कतरिना कैफकडे जाणार नाही. रोहित शेट्टीचं हे वक्तव्य न आवडल्याने कतरिनाच्या चाहत्यांकडून ट्विटरवर ‘shame on Rohit Shetty’ ट्रेंडिंग होत आहे. दरम्यान कतरिनाने रोहित शेट्टीचं वक्तव्य चुकीच्या अर्थाने घेण्यात आल्याचं म्हटलं आहे.

कतरिनाने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “मी शक्यतो कोणत्याही मीडिया रिपोर्ट किंवा लेखावर प्रतिक्रिया देत नाही. पण या प्रकरणात मला वाटतं रोहित सरांनी केलेलं वक्तव्य चुकीच्या अर्थाने घेण्यात आलं आहे. फ्रेममध्ये तीन हिरो आणि स्फोट होत असल्याने कोणीही तुझ्याकडे पाहणार नाही असं रोहित शेट्टी यांनी म्हटलं होतं असं मला कळलं आहे. पण ते असं अजिबात बोलले नव्हेत”.

“मी रोहित सरांकडे सीनमध्ये डोळे मिटल्याचं सांगितलं होतं. त्यावर त्यांनी फ्रेममध्ये चार लोक एकत्र आहेत आणि मागे ब्लास्ट होत आहे. त्यामुळे तू डोळे मिटले आहेत याकडे कोणाचं लक्ष जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. पण त्यानंतरही आम्ही अजून एक शॉट घेतला. माझी रोहित सरांसोबत चांगली मैत्री असून आम्ही कोणत्याही विषयावर चर्चा करु शकतो. एक मित्र म्हणून ते नेहमी माझ्यासाठी हजर असतात. त्यांचं वक्तव्य पूर्णपणे चुकीच्या पद्दतीने घेण्यात आलं आहे,” अशी बाजू मांडत कतरिनाने मांडली आहे.

नेमकं काय झालं ?
दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट सुर्यवंशी लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. पण सोशल मीडियावर कतरिना कैफच्या चाहत्यांकडून रोहित शेट्टीविरोधात ट्रेंड सुरु आहे. म्हणजे रोहित शेट्टीने कतरिना कैफसंबंधी केलेलं एक वक्तव्य तिच्या चाहत्यांना अजिबात आवडलेलं नाही.

नेमकं काय म्हणाला रोहित शेट्टी ?
सूर्यवंशी चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये अक्षय कुमार, रणवीर सिंग, अजय देवगण आणि कतरिना कैफ दिसणार आहेत. रोहित शेट्टीने या सीनसंबंधी बोलताना म्हटलं होतं की, “तुम्हाला तीन वेळा हा सीन पहावा लागेल. या सीनमध्ये स्फोट दाखवण्यात आले असून कतरिना कैफही दिसत आहे. जर तुम्ही नीट पाहिलंत तर कतरिनाचे डोळे मिटत आहेत. चौथ्या शॉटनंतर कतरिनाने माझ्याकडे येऊन अजून एकदा हा सीन घेऊयात का असं विचारलं. त्यावर मी तिला सांगितलं की, खरं सांगायचं तर तुझ्याकडे कोणीही पाहणार नाही. यावर तिला खूप राग आहे. हे तू कसं काय सांगू शकतोस ? अशी विचारणा तिने केली. ती खूप चिडली होती. त्यावर मी तिला सांगितलं की, तिघे मागे स्फोट सुरु असताना चालत असताना कोणीही तुझ्याकडे पाहणार नाही. मी तोच सीन ठेवला आहे. यामध्ये तुम्हाला कतरिनाचे डोळे बंद होताना दिसतील. पण कोण पाहणार?”.

सिंघम, सिम्बा नंतर रोहित शेट्टीचा सुर्यवंशी चित्रपट येत आहे. चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून अजय देवगण आणि रणवीर सिंगही पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहेत. २४ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.