रणबीर आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे हे सांगून झाल्यावरही कतरिनाने आपण अजून कितीतरी वर्ष लग्न करणार नाही, असे स्पष्ट बोलून दाखवले. तिच्या या वक्तव्याचा कोणी फारसा गांभीर्याने विचार केला नसला तरी खुद्द रणबीरने मात्र, तिची अभिनेत्री म्हणून असलेली महत्त्वाकांक्षा प्रेमापेक्षा मोठी असल्याची कुजबूजत का होईना कबुली दिली आहे.
सध्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील परफॉर्मन्सच्या तालमीत व्यग्र असलेल्या रणबीरने म्हणे नुकतेच आपल्या मित्राकडे आपले मन मोकळे केले. कतरिनाची अभिनेत्री म्हणून नावलौकिक कमावण्याची महत्त्वाकांक्षा आपल्यापेक्षा जास्त आहे. आणि आमचे प्रेमाचे नाते तिच्या कारकीर्दीच्या आड मी कधीही येऊ देणार नाही, असे रणबीरने आपल्या मित्राला सांगितले. रणबीरच्या या कबुलीजबाबामुळे त्या दोघांच्या प्रेमप्रकरणाबद्दल नव्याने चर्चा होऊ लागली आहे.
स्पेनसुट्टीतील छायाचित्रांच्या प्रकरणानंतर कतरिनाने रणबीरच्या मागे लग्नाचा धोशा लावला आहे आणि त्याची अजून तयारी नाही, असे चित्र रंगवले गेले होते. प्रत्यक्षात, त्या घटनेनंतर माध्यमांना ईमेल पाठवून आपला राग व्यक्त करणारी कतरिना त्यानंतर बरीच सावरली आहे. ‘धूम ३’च्या चित्रिकरणातून बाहेर पडल्यानंतर कतरिना या प्रसंगाबाबत जास्तच मनमोकळेपणे बोलली. दरम्यान, करीनाने तिला ‘भाभी’ म्हणून संबोधत त्यांचे प्रेमप्रकरण खुल्लमखुल्ला जाहीर केले. त्याला रणबीरनेही हरकत घेतली नव्हती. पण, करीनाने ते गंमतीत म्हटले असेल अशी सारवासारव करणाऱ्या कतरिनाने नंतर आपल्या प्रेमाची कबुली दिली पण, एवढय़ात लग्नाचा विचारही करणार नाही हेही स्पष्ट केले. त्यामुळे, रणबीरने बहुधा कतरिनाकडे लग्नाचा विषय काढला होता आणि तिने मात्र आपल्या करिअरसाठी त्याच्या प्रस्तावाला सध्या तरी ‘नाही’ या शब्दात टाळे लावून टाकले असल्याची चर्चा आहे. पण, त्यामुळे रणबीरची ‘फ्लर्टी’ प्रतिमा पुसली गेली असून ‘समजूतदार प्रियकर’ अशी नवी प्रतिमा दृढ होते आहे.