सध्या कतरिना व सलमान ‘भारत’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर व अभिनेत्री दिशा पटानी सुद्धा चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. विविध कार्यक्रमांमध्ये ते चित्रपटांविषयी बोलताना दिसत आहेत. सलमान व कतरिनाच्या जोडीची जादू पुन्हा एकदा अनुभवणे चाहत्यांसाठी उत्सुकतेचे आहे.

‘फिल्मफेअर’ला दिलेल्या एका मुलाखतीत कतरिनाने आयुष्यातील चिंता व भीतीला कसे सामोरे जायचे याबद्दल सांगितले. बॉलिवूडमधील कलाकार कायमच त्यांच्या आयुष्यातील ताण किंवा संघर्षाबद्दल बोलताना दिसतात. कतरिनानेही असे कधी कोणाजवळ मन मोकळे केले होते का? असा प्रश्न तिला विचारला असता ती म्हणाली की,”प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक पातळीवर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असते. मध्यंतरी आलिया भट्टने सुद्धा तिच्या आयुष्यातील ताणाबद्दल सांगितले होते. आयुष्य जगताना कधीतरी ताणातून जाणेसुद्धा साहजिक आहे. दीपिकाने सुद्धा नैराश्याविरुद्धच्या तिच्या लढ्याबद्दल सांगितले होते.”

“मला पुस्तकांनी व इतर गोष्टींनी संकटांवर मत करायला शिकवलं. आपल्या मनात आलेल्या प्रत्येक विचाराला व भावनेला आपण खतपाणी घालण्याची गरज नसते. हे जग तुमच्या किंवा माझ्यामुळे चालत नाही. जगाची स्वतंत्र रीत आहे. जगावर विश्वास ठेवा. जो कोणी हे जग चालवतोय, ती शक्ती आपल्याही मागे असते. अयोग्य विचारांना मनात स्थान देऊ नका.” असंही ती म्हणाली.

‘भारत’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे. ‘भारत’ चित्रपटात रशियन सर्कस आणि अन्य काही साहसी दृश्य पाहायला मिळणार आहेत. ‘भारत’मध्ये दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट ५ जून म्हणजेच ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.