रणबीर कपूर आणि कतरिना कैफ बॉलीवूडच्या या बहुचर्चित जोडीने ३० डिसेंबर २०१४ रोजी लंडनमध्ये गुपचूप साखरपुडा उरकला असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली आहे.
कतरिना गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत आहे. दरम्यान, काही दिवसांनी रणबीर देखील आपला जिवलग मित्र अयान मुखर्जीसोबत लंडनच्या विमानतळावर आढळून आला. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, रणबीरने कतरिनासोबत साखरपुडा करूनच लंडनहून परतण्याचे ठरविले आणि रणबीरचे कुटुंबियांसाठी  खासगी विमानाने लंडनला येण्याची व्यवस्था कतरिनाच्या कुटुंबियांनी केली. ऋषि आणि नितू कपूर लंडनमध्ये दाखल झाल्यानंतर ३० डिसेंबर रोजी मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीत रणबीर-कतरिनाचा साखरपुडा उरकण्यात आल्याची चर्चा आहे. परंतु, अद्याप यास दुजोरा मिळालेला नाही.  
रणबीर-कतरिना या दोघांनीही आजवर वारंवार त्यांच्यातील जिव्हाळ्याच्या संबंधांचे उघडपणे समर्थन केलेले नाही. परंतु, अनेकवेळा दोघेही सार्वजनिक आणि वैयक्तिक आयुष्यातही खुल्लमखुल्ला एकत्र सुट्ट्या आणि नाईटआऊट्स करताना दिसले आहेत. त्यामुळे ‘यह पब्लिक है, सब जानती है’ याचीही जाणीव दोघांना असावी म्हणूनच की काय आजवर दोघांकडूनही त्यांच्यातील नात्याचे पूर्णपणे खंडन करण्यात आले नाही. तसेच दोघांनी एक घर खरेदी करुन एकत्रित राहण्याचाही निर्णय घेतला. पण, आता या जोडीने आणखी पुढचे पाऊल उचलायचे ठरवले आणि साखरपुडा उरकून यंदाच्या वर्षात शुभमंगल करण्याचा दोघांचाही विचार असल्याचे समजते.