बॉलीवूडमधील चर्चित जोडींमध्ये रणबीर-कतरिनाचे नाव घेतले जाते. हे दोघे पडद्यामागे एकमेकांच्या कितीही जवळ असले तरी पडद्यावर रणबीरसोबत काम करणे कतरिनाला कठीण जाते.
रणबीर-कतरिनाने ‘अजब प्रेम गजब कहानी’ आणि ‘राजनीती’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यानंतर आता ही जोडी अनुराग बासूच्या ‘जग्गा जासूस’मध्ये एकत्र झळकणार आहेत. मात्र, दोन चित्रपटांचा एकत्र अनुभव असूनही, आपल्याला रणबीरसोबत काम करणे कठीण जात असल्याचे कतरिनाचे म्हणणे आहे. याविषयी बोलताना कतरिना म्हणाली की, मी ओळखत असलेल्या जवळच्या व्यक्तींसोबत काम करणे मला नेहमीच कठीण जाते. अनोळखी व्यक्तीसमोर काम करणे केव्हाही सोपे असते. पण, तुम्हाला माहित आहे की समोरची व्यक्ती तुम्हाला चांगल ओळखते. तिच्यासमोर तुम्ही अभिनय करतायं. अर्थातचं, हे खोटे वागणे त्याला कळत असते. त्यामुळे रणबीरसोबत काम करताना मला अवघडल्यासारखं होतं.
‘जग्गा जासूस’चा दिग्दर्शक अनुराग बासू आणि कतरिना यांच्यात वाद असल्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होत नसल्याची चर्चा गेले काही दिवस होती. त्यावर ही केवळ अफवा असून मी आणि रणबीर इतर प्रोजेक्टमध्ये गुंतल्यामुळे चित्रीकरणास उशीर होत असल्याचेही तिने सांगितले.