कतरिना कैफ आणि वरुण धवन हे दोघंही पहिल्यांदाच रेमो डिसूजाच्या एका डान्स चित्रपटासाठी एकत्र येणार होते. या जोडीला एकत्र पाहण्यास चाहतेही उत्सुक होते मात्र कतरिनानं या चित्रपटातून माघार घेतली असल्याचं समजत आहे. व्यग्र वेळापत्रकामुळे तिनं रेमोला आपला नकार कळवला असल्याचं समजत आहे.

एबीसीडी, एबीसीडी २ यांसारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेला रेमो पुढील वर्षात डान्स या संकल्पनेवर आधारित आणखी एक चित्रपट घेऊन येणार होता. या चित्रपटात वरूण धवन आणि कतरिना या दोघांची नावं मुख्य भूमिकेसाठी पक्की करण्यात आली होती. मात्र कतरिनानं आता या चित्रपटाला नकार कळवला आहे. कतरिना सध्या ‘भारत’ चित्रपटात व्यग्र आहे. या व्यग्र वेळापत्रकामुळे रेमोच्या चित्रपटाला वेळ देता येणार नाही, असं तिनं कळवलं आहे.

२२ जानेवारीपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होती. मात्र ‘भारत’ चित्रपटाचं बरंच चित्रीकरण व्हायचं आहे म्हणूनच कतरिनानं या चित्रपटातून माघार घेतली आहे.