'कौन बनेगा करोडपती'च्या (केबीसी) १२ व्या पर्वातील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागामध्ये सहभागी झालेल्या अनामया योगेश दिवाकरने एक कोटींच्या प्रश्नावर खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. अमिताभ बच्चन अनामयाच्या हुशारीने फारच प्रभावित झाल्याचं चित्र दिसलं. कर्नाटकमधील उडपी येथील असणाऱ्या अनामयाला गाड्यांची फार आवड असल्याचं तिने अमिताभ यांना सांगितलं होतं. अनामयाने मागील भागातून कालच्या भागात रोल ओव्हर कंटेस्टंट म्हणून प्रवेश करत तिसऱ्या प्रश्नापासून खेळ सुरु केला. मात्र ती महाभारतासंदर्भात विचारलेल्या एक कोटींच्या प्रश्नावर अडकली आणि तिने धोका न पत्कारण्याचा निर्णय घेत ५० लाख रुपयांची रक्कम घेऊन खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. एक कोटींसाठी अनामयाला महाभारतामधील कर्णासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. ५०-५० लाइफलाइन वापरुनही अनामयाला या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. कर्णाचा असा कोणता पुत्र होता जो कुरुक्षेत्रातील लढाईनंतरही जिवंत राहिला आणि त्याने नंतर युधिष्ठिराच्या अश्वमेध यज्ञामध्ये सहभाग घेतला होता?, असा हा प्रश्न होता. या प्रश्नावर अनामयाने आपली शेवटची लाइफ लाइन वापरली मात्र त्यानंतरही तिला या प्रश्नाच्या उत्तराबद्दल काहीच कल्पना नसल्याने तिने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. अनामयाने ५० लाख जिंकले. अनामयाने खेळ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमिताभ यांनी या प्रश्नाचं उत्तर सांगितलं. कर्ण हा पराक्रमी आणि शूर होता. कर्णाला एकूण नऊ मुलं होती. महाभारताच्या युद्धानंतर या नऊ मुलांपैकी केवळ एकच मुलगा जिवंत राहिला. या मुलाचे नाव होतं वृषकेतु. हा कर्णाचा सर्वात धाकटा मुलगा होता. आता कर्ण आणि त्याच्या कुटुंबाबद्दल तसेच हा वृषकेतु कोण होता याबद्दल जाणून घेऊयात. दोन विवाह आणि नऊ मुलं कर्णाने दोन विवाह केले होते. कर्णाची पहिली पत्नी होती वृषाली आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीचं नाव होतं सुप्रिया. सुप्रियाचा उल्लेख महाभारतामध्ये अगदी कमी वेळा झाल्याचे पहायला मिळतं. वृषाली आणि सुप्रिया या दोघींकडून कर्णाला एकूण नऊ मुलं होती. वृशसेन, वृषकेतु, चित्रसेन, सत्यसेन, सुशेन, शत्रुंजय, द्विपात, प्रसेन आणि बनसेन अशी या सर्वांची नावं होती. कोण आहे वृषकेतु? कर्णाच्या मृत्यूनंतर त्याची पहिली पत्नी वृषाली सती गेली. महाभारताच्या युद्धानंतर पांडवांना कर्ण हा आपला मोठा भाऊ असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी युद्धात जिवंत राहिलेल्या वृषकेतु या कर्णाच्या पुत्राला संरक्षण दिलं. त्यांनी वृषकेतुला सर्वात मोठ्या भावाचा पुत्र या नात्याने सर्व मानसन्मान आणि अधिकार दिले. महाभारताच्या युद्धानंतर वृषकेतुने अर्जुनाच्या नेतृत्वाखाली पांडवांच्या बाजूने अनेक युद्धांमध्ये सहभाग नोंदवत आपला पराक्रम दाखवला. आठ जणांचा युद्धभूमीवरच मृत्यू कर्णाच्या आठ मुलांचा महाभारताच्या युद्धामध्ये मृत्यू झाला. प्रसेनचा वध सात्यकिने केला. शत्रुंजय, वृशसेन आणि द्विपातला अर्जुनाने मारले. तर भीमाने बनसेनला ठार केलं. त्याचप्रकारे चित्रसेन, सत्यसेन आणि सुसेन यांना नकुलने ठार केलं. .अन् कुंतीने केला खुलासा कर्ण हा कुंतीपुत्र होता. कुंतीचे लग्न होण्याआधीच सूर्य देवतेच्या आशिर्वादाने कुंतीच्या गर्भातूनच कर्णाचा जन्म झाला होता. लोकं काय म्हणतील या भितीने कुंतीने कर्णाला नदीत सोडलं होतं. त्यानंतर कर्ण संपूर्ण आयुष्य सूतपुत्र म्हणून जगला. नंतर महाभारताच्या युद्धामध्ये कुंतीने पांडाव आणि कर्णासमोर कर्ण आपलाच पुत्र असल्याचं जाहीरपणे सांगितलं. वृषकेतु राजा झाला पांडवांनी कर्णाचा मुलगा वृषकेतुचा स्वत:च्या मुलांप्रमाणे संभाळ केला. वृषकेतुला इंद्रप्रस्थचा राजा बनवण्यात आलं. महाभारताच्या युद्धानंतर युधिष्ठिराला चक्रवर्ती सम्राट घोषित करण्यात आलं. अनेक राजे त्याच्या अश्वमेध यज्ञात सहभागी झाले आणि त्याचे नेतृत्व स्वीकारलं. यामध्ये वृषकेतुचाही समावेश होता.