बरेच चित्रपट किंवा टेलिव्हिजन शो हे त्यांच्या अनोख्या शैलीमुळे चर्चेत असतात. असाच एक कार्यक्रम म्हणजे कौन बनेगा करोडपती. बऱ्याच वर्षांपासून या कार्यक्रमाने सर्वसामान्य व्यक्तींना करोडपती होण्याची संधी दिलीये. त्यातही या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा खुद्द अमिताभ बच्चन यांनी सांभाळल्यामुळे हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाला एक वेगळाच उत्साह येतो. 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय होण्यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. ते कारण म्हणजे या शोमध्ये अमिताभ बच्चन यांची सूत्रसंचालन शैली आणि त्यादरम्यान वापरले जाणारे काही शब्द. 'केबीसी'मध्ये काही साचेबद्ध शब्दांना असा टच देण्यात आलाय की, हे शब्द अनेकजण त्यांच्या रोजच्या आयुष्यात वापरतात. केबीसीमध्ये वापरले जाणारे हे शब्द म्हणजे 'देवीयो और सज्जनो.', 'कॉम्प्युटर जी, लॉक किया जाए' आणि असे बरेच शब्द या कार्यक्रमात वापरले जातात. मुख्य म्हणजे बिग बी ज्या शैलीत या शब्दांचा वापर करतात ती शैलीही अनेकांचीच मनं जिंकते. अनेकांचा असा समज आहे की, हे शब्द बिग बी बोलण्याच्या ओघात म्हणून जातात. कारण, हिंदी संभाषणावर त्यांचं प्रभुत्व आहे. बिग बी हिंदी संभाषणात निपुण असले तरीही केबीसीमध्ये वापरले जाणाऱ्या काही शब्दांची ओळख एका वेगळ्याच व्यक्तीने करुन दिलीये. 'केबीसी'मध्ये बिग बी जे संवाद बोलतात ते लिहिण्यामध्ये लेखक आर.डी.तैलंग यांचं मोठ योगदान आहे. कॉम्प्युटरला 'कॉम्प्युटर जी', लेडिज अॅण्ड जंटलमनला 'देवीयो और सज्जनो' अशी नवी रुपं दिली आहेत. या शब्दांसोबतच अतिशय लोकप्रिय झालेल्या 'लॉक किया जाए' हा शब्दही तैलंग यांनीच सर्वांसमोर आणला आहे. त्यामुळे यापुढे केबीसीमध्ये बिग बी जेव्हा 'नमस्कार, आदाब, सत्श्री अकाल, कौन बनेगा करोड़पती में आपका स्वागत है', असं म्हणतील तेव्हा तैलंग यांचं नाव कोणीही विसरणार नाही. टेलिव्हिजन विश्वात तैलंग हे नाव नवं नाहीये. शेखर सुमनच्या 'मुव्हर्स अॅण्ड शेकर्स' या कार्यक्रमाची स्क्रीप्टसुद्धा तैलंग यांनीच लिहिली होती. तर, 'खतरों के खिलाडीचंही' स्क्रीप्ट त्यांनी लिहिलेली. टेलिव्हिजन कार्यक्रमांव्यतीरिक्त त्यांनी 'अजब प्रेम की गजब कहानी', 'अर्जुन द वॉरियन प्रिन्स' या चित्रपटांचीही स्क्रीप्ट लिहिली आहे.