छोट्या पडद्यावरील ‘केबीसी’ म्हणजेच ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो सध्या चांगलाच चर्चिला जात आहे. आतापर्यंत या पर्वात अनेक स्पर्धकांनी हजेरी लावली असून दिवसेंदिवस हा शो रंजक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत अनेकांनी या शोमध्ये सहभाग घेतला आहे. अलिकडेच रंगलेल्या या भागात रेखा रानी या महिला स्पर्धकाने तब्बल ६ लाख ४० हजार रुपये जिंकले. मात्र, एकेकाळी या स्पर्धकाकडे साधं दूध येण्याइतपतही पैसे नसल्याचं तिने सांगितलं.

केबीसीच्या गुरुवारी झालेल्या भागात रेखा रानी या हॉटसीटवर बसल्या होत्या. यावेळी त्यांनी खेळ खेळण्यासोबतच अमिताभ बच्चन यांच्याशी अनेक गोष्टींवर चर्चा केली. विशेष म्हणजे त्यांच्या मस्तीखोर स्वभावामुळे उपस्थित अनेकांची मनं जिंकली. परंतु, यावेळी रेखा रानी यांनी त्यांच्या जीवनातील संघर्ष काळदेखील सांगितला.

दिल्लीतील एका मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रेखा रानी यांनी ६ लाख ४० हजार रुपयांची रक्कम जिंकल्यानंतर त्या भावनाविवश झाल्या. आहे उभ्या आयुष्यात इतकी मोठी रक्कम कधीच पाहिली नाही असं सांगितलं.

“करोनामुळ ओढावलेल्या संकटामुळे घरात बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. दूध घेण्यासाठी साधे १० रुपये सुद्धा घरात नसायचे. एक वेळ तर अशी आली की कोणत्याही कुटुंबीयांना किंवा ओळखीच्या लोकांना फोन केला तर त्यांना वाटायचं की आम्ही पैसे मागण्यासाठीच फोन करतोय. त्यामुळे अनेकदा ते आमचा फोन उचलत नसतं. या काळात माझ्या मित्रपरिवाराने आम्हाला जी मदत केली आहे ती कोणता नातेवाईकदेखील करु शकणार नाही”, असं रेखा रानीने सांगितलं.

रेखा रानी यांनी १२ लाख ५ हजार रुपयांच्या प्रश्नावर हा शो सोडला. सईद मिर्झा यांच्या नसीम या चित्रपटात नसीनच्या आजोबांची भूमिका कोणत्या कवीने साकारली होती?असा प्रश्न रेखा रानी यांना विचारण्यात आला होता. यासाठी (A) कैफी आझमी, (B) मजरूह सुल्तानपुरी, (C) गुलजार, (D) जावेद अख्तर, असे ऑप्शन होते. मात्र, रेखा रानी यांनी या प्रश्नाचं उत्तर ठावूक नव्हतं. त्यामुळे त्यांनी हा गेममध्येच सोडला. या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. कैफी आझमी.