झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'लागिरं झालं जी' या मालिकेमध्ये सध्या आनंदाचं वातावरण दिसून येत आहे. नुकतंच आज्या आणि शितलीचं लग्न झालं आहे. मात्र लग्न झाल्यानंतरच शीतलला मामीच्या रागाला आणि जयडीच्या कुत्सिक नजरेला समोरं जावं लागतं आहे. त्यातही निर्मात्यांनी मालिकेतील गोडवा टिकवून ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन होत आहे. प्रेक्षकांचं पडद्यावर जरी मनोरंजन होत असलं तरी पडद्यामागे मात्र सारं अलबेल झाल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकेतील लोकप्रिय व्यक्तीरेखा मामी आणि जयडी यांनी ही मालिका सोडली आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा थोडा हिरमोड झाला असून मामी-जयडीच्या या निर्णयामागचं खरं कारणं नुकतंच समोर आलं आहे. ''एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने ही माहिती समोर आणली आहे. आज्जा आणि शितलीचं लग्न झाल्यानंतर काही दिवसामध्येच मामी (विद्या सावळे) आणि जयडी (किरण ढाणे) यांनी मालिकेतून एक्झिट घेतली. त्यांच्या अशा अचानक जाण्यामागंच कारण जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक होते. कारण अनेकवेळा मामी,जयडी आणि राहुल्या यांनी आज्जा आणि शितलीपेक्षाही प्रेक्षकांचं जास्त मनोरंजन केलं होतं. त्यामुळे त्यांच्या अशा एक्झिटमुळे प्रेक्षकांचा मूडऑफ झाला आहे. मात्र नुकतंच मामी आणि जयडीने त्यांच्या मालिका सोडण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. मालिकेमध्ये सर्वाधिक मानधन अर्थात आजिंक्य आणि शितलला मिळत आहे. त्यामानाने इतर कलाकारांना कमी मानधन मिळत असून मामी आणि जयडी यांचं मानधन अन्य कलाकारांपेक्षाही कमी असल्याचं सांगण्यात येत आहे. कमी मानधन मिळत असल्यामुळे अनेक वेळा किरण आणि विद्या यांनी प्रोडक्शन हाऊसबरोबर चर्चाही केली होती. मात्र तरीदेखील त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही.तसेच अनेक वेळा अतिरिक्त केलेल्या कामाचा मोबदलाही मिळत नसल्याचं विद्या यांनी सांगितलं. कमी मानधनाच्या कारणामुळेच या दोघींनी ही मालिका सोडली असून त्यांना प्रोडक्शन हाऊसकडून पुन्हा बोलावणं येईल असं वाटत नाही. मात्र प्रेक्षकांच्या प्रेमाखातर पुन्हा एकदा मालिकेत कमबॅक करावं असं या दोघींना वाटलं होतं. परंतु प्रोडक्शन हाऊस मानधनाविषयी तडजोड करण्यास तयार नसल्यामुळे त्यांनी हा विचार सोडून दिला आहे. विशेष म्हणजे ही मालिका सोडल्यानंतरही त्यांनी प्रेक्षकांना मालिका पाहण्याचं आवाहन केलं आहे.