बॉलिवूडमधील एक अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणून आजही किशोर कुमार यांच्याकडे पाहिलं जातं. याच हरहुन्नरी अशा किशोर कुमार यांची आज पुण्यतिथी. किशोर कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अभिनेता, गीतकार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक म्हणून भूमिका बजावली. किशोर कुमार यांचा कांडवामधील एका बंगाली कुटुंबामध्ये जन्म झाला. घरातलं शेंडेफळ असलेल्या किशोर दा यांचे ज्येष्ठ बंधू अशोक हे बॉलिवूडमध्ये अभिनेते म्हणून प्रसिद्धीस येत होते. त्यामुळे आपल्या भावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन किशोर यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. किशोर दा गायक आणि अभिनेते के.एल.सैगल यांचे खूप मोठे चाहते होते. त्यांना ते गुरू मानत होते. चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी पार्श्वगायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किशोर कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रसिद्ध गाणी गायली. हिंदी भाषेसोबतच त्यांनी मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम अशा विविध भाषांमध्येदेखील गाणी गायली आहेत. ‘माना जनाब ने पुकारा नही’, ‘ओ हंसीनी मेरी हंसीनी’, ‘रुप तेरा मस्ताना’, ‘एक लडकी भिगी भागी सी’, ‘हाल कैसा है जनाब का’ अशी कितीतरी सुपरहिट गाणी गात रसिकांच्या मनावर राज्य केले. दरम्यान, आयुष्यभर चंदेरी दुनियेमध्ये वावरणाऱ्या या कलाकाराने साऱ्यातून निवृत्ती घेत पुन्हा एकदा आपल्या गावी खांडव्याला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. १३ ऑक्टोबर १९८७ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच निधन झालं.