अभिनेता कमाल आर. खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने नामांकित वकील सतीश मानेशिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी रियाची केस तुम्ही जिंकू शकणार नाही, असं म्हणत कमालने आपला संताप व्यक्त केला आहे.

अवश्य पाहा – सुशांत आत्महत्या प्रकरण : रिया चक्रवर्तीची सर्वोच्च न्यायालयात धाव

अभिनेता सुशांत सिंह राजपुतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणातून सुखरुप बाहेर पडण्यासाठी रियानं सलमान खान आणि संजय दत्त यांची केस लढणाऱ्या भारतील प्रसिद्ध वकिलांपैकी एक असलेल्या सतीश मानेशिंदे यांना नेमलं आहे. त्यांच्यावर कमाल आर. खानने जोरदार टीका केली आहे. “सतीश मानेशिंदे यावेळी तुम्ही जिंकू शकणार नाही. कारण हे युद्ध सत्य आणि असत्यामध्ये आहे. श्री राम यांनी रावणाचा श्रीलंकेत त्याच्याच घरात जाऊन वध केला होता. याचा अर्थ सत्याचाच विजय होतो. रिया चक्रवर्ती तुझा खरा चेहरा आता सर्वांच्या समोर आला आहे.” अशा आशयाचे ट्विट करुन त्याने आपला राग व्यक्त केला आहे.

मृत्यूनंतर सुशांत ट्विटरवर ‘आलिया भट्ट’ला फॉलो करतोय? कंगनाने विचारला प्रश्न

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास दिल्याचाही आरोप आहे. सुशांतच्या नातेवाईकांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केलेली आहे. दुसरीकडे सुशांत सिंहच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी अशी वारंवार मागणी केली जात आहे. ही मागणी करणाऱ्यांमध्ये भाजपा नेते सुब्रहमण्यम स्वामी, भाजपा खासदार निशिकांत दुबे, पप्पू यादव, तेजस्वी यादव, अभिनेता शेखर सूमन तसंच रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे. रिया चक्रवर्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. भाजपा नेते सुब्रहमण्यम स्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंबंधी पत्रही लिहिलं होतं.