कमाल आर खानचे प्रत्येक ट्विट चर्चेचा विषय ठरते. विविध विषयांवर कोणीही विचारले नसताना हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक त्याची मते मांडताना दिसतो. सेलिब्रिटी त्याच्या ट्विटकडे फारसे लक्ष देत नसले तरी नेटकरी मात्र त्याच्या ट्विटची आतुरतेने वाट पाहात असतात. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येपासून ते ड्रग्ज कनेक्शनपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर केआरकेने त्याचे मत मांडले होते. आता त्याने केलेले आणखी एक ट्विट चर्चेत आहे. या ट्विटमध्ये त्याने जर मला काही झाले तर बॉलिवूडमधील बडे कलाकार जबाबदार असतील असे म्हटले आहे.

या ट्विटमध्ये केआरकेने त्याच्या जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे. ‘मी सर्वांना सांगू इच्छितो की जर मला काही झाले तर त्याला करण जोहर, सलमान खान, अक्षय कुमार, आदित्य चोपडा, साजिद नाडियाडवाला जबाबदार असतील. कारण त्यांनी मला मारण्याचा प्लॅन केला आहे’ असे त्याने म्हटले आहे. तसेच त्याने हे ट्विट पंतप्रधाव नरेंद्र मोदी, अमित शाह आणि एका न्यूज चॅनेलला टॅग केले आहे.

केआरकेचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे. अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तर केआरकेला कंगनाचे मेलव्हर्जन म्हटले आहे. एका यूजरने केआरके केवळ कंगानाला कॉपी करतो असे कमेंटमध्ये म्हटले आहे. तर काहींनी केआरकेची खिल्ली उडवली आहे. केआरकेचे ट्विट म्हणजे एक विनोद असतो असे दुसऱ्या एका यूजरने म्हटले आहे.