काही दिवसांपूर्वीच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कमाल आर खान यांच्यात ट्विटवर शाब्दिक युद्ध झाले होते. सिद्धार्थ आणि आलियाच्या फोटोशूटवरून कमालने काही चुकीच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यावर सिद्धार्थनेही त्याला प्रत्युत्तर दिले होते. मात्र, या भांडणाची सुरुवात ही फार पूर्वीच झाली होती, असा खुलासा सिद्धार्थने इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉमशी बोलताना केला.
सिद्धार्थ म्हणाला की, या मागे अनेक गोष्टी आहेत. कमाल खान मला मुलींचे मॉर्फ फोटो (यात मुलींच्या फोटोत बदल केलेले असतात) व्हॉट्सअॅपवर पाठवायचा. त्यामुळे अनेक वाददेखील  निर्माण झाले. कमालने याबाबत माझी माफी मागितली पण तो मला म्हणाला की, जर तुला या गोष्टीचा इतका राग येतो तर तू मला तसं आधीच का नाही सांगितलं. कमालच्या माफीनंतर या दोघांमधील वाद संपल्याचेही सिद्धार्थने यावेळी सांगितले. पुढे तो म्हणाला की, मी कमालला एक व्हिलन चित्रपटासापासून ओळखतो. तो एक भावनावश व्यक्ती असून त्याच्या चुकांसाठी तो माफीसुद्धा मागतो. आमच्या चित्रपटावर कमालने कोणतीही टिप्पण करावी पण कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर कोणतीही वाईट प्रतिक्रिया त्याने देऊ नये.
आलिया आणि इतर मुलींच्या समर्थनार्थ कमाल खानला सिद्धार्थने दिलेल्या प्रत्युत्तराने आलिया त्याच्यावर खूप खूश आहे. आलिया म्हणाली की, सिद्धार्थने जे केले ते चांगलेच आहे. कमाल खानसारख्या व्यक्तिंकडे लक्षच देऊ नये असे मला वाटते. जे काही घडले त्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. सिद्धार्थच्या म्हणण्यात तथ्य आहे. जर तुम्ही टीकाकार असाल तर तुम्ही आमच्या चित्रपटांतील कामावर टीका करा. तुम्हाला मुलींविषयी कोणत्याही अनुचित गोष्टी बोलण्याची गरज नाही. गलिच्छ आणि खालच्या दर्जाचे वक्तव्य करणा-या अशा व्यक्तींना चित्रपटसृष्टीने अजिबात प्रोत्साहन देता कामा नये, असेही आलिया म्हणाली.