छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ ओळखला जातो. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला शो ‘बिग बॉस १४’ सध्या चर्चेत आहे. नुकताच कुमार सानू यांचा मुलगा जान सानू बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. त्यानंतर त्याने वडिलांनी संगोपनाबाबत केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. ‘माझ्या संगोपनाबाबत प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही’ असे जान म्हणाला होता. आता कुमार सानू यांनी जानच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतीच कुमार सानू यांनी ‘बॉलिवूड लाइफ’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी जानच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. ‘मी त्याला काही वाईट बोललो नाही. मी जानसाठी काहीच केले नाही असे जेव्हा तो बोलला तेव्हा मला खूप वाईट वाटले’ असे कुमार सानू म्हणाले.

पुढे ते म्हणाले ‘२००१ मध्ये जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हा तो खूप लहान होता त्यामुळे त्याला आठवत नसेल. पण त्यावेळी त्याच्या आईने मागितलेली प्रत्येक गोष्ट मी त्यांना दिली आहे. मी माझा बंगला आशिकी देखील दिला आहे. जानला मी अनेकदा भेटलो होतो. पण आता त्याची इच्छा असताना देखील मी त्याला भेटणार नाही.’

‘जानने मला म्हटले बाबा मला शोमध्ये घ्या, मी त्याला शोमध्ये घेतले. त्याने मला संगीत दिग्दर्शक, निर्माते यांची भेट घालून देण्यास सांगितली तेव्हा मी त्याला महेभ भट्ट, रमेश तौरानी आणि इतर काही लोकांना भेटवले. कारण या लोकांना मी खूप आधीपासून ओळखतो. आता जानला काम द्यायचे की नाही हे त्यांच्यावर आहे. हे जानच्या टॅलेंटवर आधारित आहे मी यावर काही बोलणार नाही’ असे कुमार सानू म्हणाले.

काय म्हणाला होता जान सानू?
‘माझ्या वडिलांनी आमच्याशी संपर्क ठेवण्यास नकार दिला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी माझ्या आईने मला कशी शिकवण दिली यावर प्रश्न उपस्थित करत एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर त्यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला त्यामध्ये मला पाठिंबा दिला होता. मी हे दोन्ही व्हिडीओ पाहिलेले नाहीत. पण मला असे वाटते की माझ्या संगोपनाबाबत कोणताही प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही. कारण सर्वांनी मला शोमध्ये पाहिले आहे आणि माझे कौतुक देखील केले आहे’ असे जान एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता.

काय म्हणाले होते कुमार सानू?

‘बिग बॉस १४’च्या घरात मराठी भाषेची चीड येते, असं विधान केल्यामुळे जान सानूवर टीका केली जात होती. याप्रकरणी कुमार सानू यांनी संपूर्ण महाराष्ट्राची हात जोडून माफी मागितली आहे. ‘गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलंय. मुंबईबद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल मी कुठलीच चुकीची गोष्ट माझ्या मनातसुद्धा आणू शकत नाही. पण माझ्या मुलाने खूप मोठी चूक केली आहे. त्याच्या आईने त्याला कशी शिकवण दिली माहित नाही, पण त्याच्या वडिलांच्या नात्याने मी सर्वांची हात जोडून माफी मागतो. गेले २७ वर्षे तो माझ्यासोबत राहत नाही”, असे ते म्हणाले होते.