रवींद्र पाथरे

नेकदा आपण एखादी घटना वा व्यक्तीसंबंधी आपल्या पूर्वानुभवातून निश्चित झालेल्या धारणांतून, आपल्या पिंडप्रकृतीशी सुसंगत मूल्यांतून, तर कधी ती घटना वा व्यक्तीबद्दलच्या आकलनातून विशिष्ट ग्रह वा समज/गैरसमज करून घेत असतो. कधी इतरांनी सांगितलेल्या गोष्टींनी आपण आपलं मत बनवत असतो. ते नेहमी बरोबर असतंच असं नाही. मात्र, आपल्या त्या मतामुळे वा त्या अनुषंगाने केलेल्या कृतीपायी ती व्यक्ती वा त्या घटनेचे कोणते परिणाम होऊ शकतात- वा होतात, हे अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. पुढे कधीतरी ते आपल्या निदर्शनास येतात. पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असू शकते. आपण एखाद्या  व्यक्तीच्या चांगल्या-वाईटास कळत वा नकळतपणे कारण ठरत असतो आणि त्याची पुसटशीदेखील जाणीव आपल्याला नसते. अनेकदा हे कधीच आपल्याला कळत नाही. याचं कारण मानवी जीवन हे प्रवाही असतं. त्यामुळे त्या घटनेपासून वा व्यक्तीपासून आपण तोवर खूप दूर गेलेलो असतो. परिणामी घडल्या चुकीची दुरुस्तीही संभवत नाही. आपल्या हातून कळत-नकळत जे बरं-वाईट व्हायचं ते आधीच होऊन गेलेलं असतं. त्याबद्दल पश्चात्ताप करण्याखेरीज हाती काही उरत नाही.  केव्हा केव्हा एखादी गोष्ट आपल्या समोर घडते. आपणही तिचा भाग असतो. परंतु तिचा योग्य तो अर्थ लावण्यात आपण कमी पडतो. जे वास्तव आपण पाहिलेलं असतं, प्रत्यक्षात ते तसं नसतंच. ते काहीतरी वेगळंच असतं. किंवा त्याचा आपण लावलेला अर्थ चुकीचा असतो. अर्थात हे आपण जाणूनबुजून केलेलं नसतं. परंतु संबंधितांचं व्हायचं ते नुकसान झालेलं असतंच. अशावेळी स्वत:ला दोष देण्याखेरीज आपण काहीच करू शकत नाही.

माणूस हा अनाकलनीय प्राणी आहे. तो वेगवेगळ्या परिस्थितीत पूर्णपणे वेगळा वागू शकतो. त्याला अनेक गोष्टी कारण असतात. माणसाला स्वत:लाही आपण कधी कसे वागू, हे निश्चितपणे सांगणं अवघड असते; तिथं दुसऱ्यांची काय कथा? तर ते असो.

मानवी आकलनासंबंधी हे आख्यान लावण्याचं कारण.. गुस्ताव मोल्लर व एमिल अ‍ॅण्डरसन यांच्या ‘डेन स्कायलिगे’ या कृतीवर आधारित संध्या गोखले लिखित आणि अमोल पालेकर दिग्दर्शित (सहदिग्दर्शन : संध्या गोखले) व अभिनित ‘कुसूर’ हे हिंदी नाटक! ‘कुसूर’च्या निमित्ताने सुमारे २५ वर्षांनंतर अमोल पालेकर यांनी रंगभूमीवर पुनश्च पाऊल ठेवलं आहे. वयाच्या पंच्याहत्तरीतदेखील ‘प्रयोग’शील राहणं हे येरागबाळ्याचं काम नाही. त्याबद्दल पालेकरांचं मन:पूर्वक अभिनंदन. त्याचवेळी हिंदूी नाटकाचं वळण नसलेल्या मुंबईतील शिवाजी मंदिरसारख्या नाटय़गृहांतून हिंदी नाटक धाडसाने सादर केल्याबद्दलही ते कौतुकपात्र आहेत.

‘कुसूर’ हे नाटक वरकरणी साधं-सरळ सस्पेन्स थ्रिलर वाटत असलं तरी त्याच्या पोटात एक गहन, गूढ चिंतन दडलेलं आहे. सद्य:स्थितीवर अप्रत्यक्षरीत्या मार्मिक बोट ठेवणारा एक धागा त्यात सूक्ष्मपणे गुंफलेला आहे. एका रात्री मुंबई पोलीस कंट्रोल रूममध्ये जे अविश्वसनीय नाटय़ घडतं, ते यात दाखवलं आहे. ती रात्रही अशी, की सबंध मुंबईत गणेशविसर्जन मिरवणुका हाताळण्याच्या कामात सगळे पोलीस गुंतलेले. अशात कंट्रोल रूमकडे फोनवरून तक्रारी येण्याचं प्रमाणही वाढलेलं. पूर्वी साहाय्यक पोलीस आयुक्त असलेले अशोक दंडवते हे कठोर शिस्तीचे, कार्यतत्पर आणि संवेदनशील पोलीस अधिकारी निवृत्तीपश्चात पोलिसांना मदत करण्यासाठी स्वेच्छेने कंट्रोल रूमची डय़ुटी करत असतात. त्यांच्या दबदब्यामुळे समस्त पोलीस दल त्यांना आदराने वचकून असतं. परंतु सेवेत असताना कुठल्याशा एका प्रकरणात त्यांना अकारण गोवलं गेलेलं असतं. ती केस अद्यापि सुरू आहे. उद्या तिची सुनावणी आहे. तरीही ते अत्यंत शांतपणे कंट्रोल रूमकडे येणाऱ्या तक्रारी हाताळताहेत. मार्गदर्शन करून, तर कधी कुणाला दमात घेऊन ते हरतक्रारीचं निवारण करीत असतात. त्यासाठी त्यांना मुंबईभरच्या पोलिसांचं साहाय्य घ्यावं लागतं.

अशात कावेरी नामक कुणा स्त्रीचा भेदरल्या आवाजात कंट्रोल रूमला फोन येतो. ती तुटकपणे जे काही सांगते त्यावरून तिच्या जिवाला धोका असतो. तिला जबरदस्तीने घराबाहेर काढून तिचा नवरा तिचा खून करण्याच्या हेतूनं कारमधून तिला शहराबाहेर नेत असतो. त्याचा डोळा चुकवून ती कंट्रोल रूमला फोन लावते. दंडवते तिला बोलतं राहण्यास सांगून तिच्याकडून सगळी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. तिने तुटक तुटक, अस्पष्टपणे दिलेल्या माहितीवरून तिचा मुलगा बंटी आणि छोटय़ा मुलीला तिच्या नवऱ्यानं घरात बंद करून ठेवलेलं असतं. त्यांच्या काळजीनं ती घाबरलेली असते. पोलिसांनी आपल्या मुलांना मदत करावी अशी विनंती ती करते. अशोक दंडवते त्यानुसार तिची गाडी ट्रॅक करत ती ज्या भागातून चाललेली असते तिथल्या पोलिसांना खबर देतात आणि तिची सुटका करण्यास सांगतात. दुसरीकडे तिच्या घरी संपर्क साधून लहानग्या बंटीकडून ते अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तो घडल्या प्रकारानं हादरलेला असतो. दंडवते बंटीला धीर देऊन त्याच्या घरी आपला पोलीस अधिकारी मित्र पांडे यांना  पाठवतात. हे सारं घडत असताना ते या घटनेचे दुवे जुळवत राहतात. कावेरी व बंटीला धीर देत त्यांना या संकटातून बाहेर काढण्याचं आश्वासन देतात. त्याचवेळी कावेरीच्या नवऱ्याला पकडण्यासाठी पोलीस कारवाईही सुरू करतात.

मात्र, त्यानंतर जे काही घडतं, त्याने दंडवते अक्षरश: हतबुद्धच होतात. करायला गेलो एक आणि झालं भलतंच असं त्यांना वाटतं. त्यांच्या कारकीर्दीला डाग लावणारी कृती नकळत त्यांच्या हातून घडलेली असते. पश्चात्ताप आणि उद्वेगाच्या त्या प्रसंगीही ते आपलं डोकं स्थिर ठेवण्याचा प्रयास करतात आणि पुढची दुर्दैवी घटना घडण्यापासून रोखतात.

या भयंकर अनुभवानं त्यांना कळून चुकतं, की अशा अनेक चुका आपल्या कारकीर्दीत आपल्या हातून नकळत घडलेल्या असू शकतात. त्यातून काहींची आयुष्यंही उद्ध्वस्त झालेली असू शकतात. त्याचं परिमार्जन आपण कसं करणार? दंडवतेंच्या या पश्चात्तापदग्ध मन:स्थितीवर नाटक संपतं खरं; परंतु एक वेगळाच प्रश्न ते उभा करतं- जो वर्तमानाशी निगडित आहे.. त्याचं काय?

संध्या गोखले यांनी जरी पाश्चात्त्य कृतीवर बेतलेलं हे नाटक लिहिलं असलं तरी ते स्वतंत्र वाटावं इतकं वेगळं आणि या मातीतलं झालं आहे. नाटकात त्यांनी दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. माणसाची विचार आणि कृती करण्याची पद्धती कधी कधी ठार आंधळीही असू शकते आणि त्याची त्या व्यक्तीला जाणीवही असत नाही. पण त्याचे जे परिणाम संबंधितांना भोगावे लागतात, त्यात त्यांची काय ‘कुसूर’? त्यांनी ते का भोगावे?

दुसरा नैतिक मूल्यात्मक प्रश्न : व्यक्तीच्या नावावरून त्याची वृत्ती-प्रवृत्ती ठरविण्याची वाढीस लागलेली कीड कुठवर आपल्याला पोखरणार?

हे दोन्हीही प्रश्न निरुत्तर करणारे आहेत. उत्तम, विचारगर्भ नाटकाचा उद्देश व फलित काय असायला हवं, याकडे ‘कुसूर’ निर्देश करतं. पोलिसांच्या दृष्टीनं वरकरणी एक नेहमीची घटना.. परंतु तिच्या खोलात गेल्यावर समाजअस्वास्थ्याचा एक धागा आपसूक हाती लागतो. इतकंच नव्हे तर संवेदनशील माणसाला तो अंतर्मुख करतो.. विचार करायला भाग पाडतो. संध्या गोखले यांनी कोणतीही पोझ न घेता वा नाटकाआडून भाषणबाजी न करता हे साध्य केलं आहे. वरवर पाहता हे वास्तवदर्शी नाटक आहे. रंजन करता करता विचारप्रवृत्त करणारं. त्याची रचना नैसर्गिक आहे. संवादांत कुठंही अलंकरण नाही, उपदेशाचे डोस नाहीत. घटनांची साखळी आपसूक उलगडत जाणारी. आणि असं असूनही ते प्रेक्षकाला खिळवून ठेवतं.

दिग्दर्शक अमोल पालेकरांनी सादरीकरणात हीच निसर्गवादी शैली उपयोजिली आहे. अनावश्यक हालचाली नाहीत की संवादांत नाटकीपणा नाही. जे घडतं ते तुमच्या समोर घडतं. त्याचे तुम्ही एक साक्षीदार आणि सहभागीदार असता. यात अनेक पात्रं असली तरी त्यापैकी तीनच पात्रं मंचावर येतात. कंट्रोल रूममधील एक पोलीस अधिकारी, दंडवतेंचे मित्र पांडे आणि स्वत: दंडवते. पैकी अशोक दंडवते वगळता इतर दोघं काही क्षणांसाठी अवतरतात. बाकी पूर्णवेळ दंडवतेच तिथं वावरतात. अन्य पात्रं केवळ फोनवरील संभाषणातून दृश्यमान होतात. या सगळ्यांचं एकजिनसी रसायन दिग्दर्शक पालेकरांनी प्रयोगात जमवलं आहे. त्यात काही कमीही नाही वा जास्तही. नाटकाचा सारा भर आहे तो संभाषण आणि त्यावरील क्रिया, प्रतिक्रिया व प्रतिक्षिप्त क्रियांवर! या सगळ्याचा तोल पालेकरांनी इतक्या सहजतेनं सांभाळला आहे! एका रात्रीत.. रिअल टाइममध्ये हे नाटक घडतं.

संध्या गोखले यांनीच नेपथ्य व वेशभूषाही केली आहे. मुंबईचं ठळक अस्तित्व जीपीएसचे भलेमोठे फ्लेक्स व इमारतींच्या सूचनातून केलं गेलं आहे. पोलीस कंट्रोल रूमचं वेगळं अस्तित्व निळ्या दिव्यांच्या माळांनी, टेबलावर पसरलेल्या फोन्सनी आणि त्यांच्या लाल दिव्यांतून अधोरेखित केलेलं आहे. रात्रीचा प्रहर व नाटय़ाशय त्यातून प्रकट होतो. हर्षवर्धन पाठकांनी प्रकाशयोजनेतून गहन, गूढ, धूसर वातावरणनिर्मिती अन् त्याद्वारे नाटकाचा आशय ठाशीव केला आहे. मंदार कमलापूरकर यांनी ध्वनिआरेखन केलं आहे. प्रतीक यादव व मर्झबान इराणी यांनी त्याची अंमलबजावणी करून रात्रीच्या मुंबईचा फील.. गणेशविसर्जनाचा माहोल साक्षात् केला आहे.

अमोल पालेकर यांनी वरपांगी कर्तव्यकठोर वाटणारा, कडक शिस्तीचा, परंतु आतून मृदु मुलायम, संवेदनशील अशोक दंडवते उत्कटतेनं साकारला आहे. त्यांचं गेश्चर, पोश्चर, हालचाली, संवादांतील विराम, शब्दांचं वजन समजून घेत केलेला त्यांचा उच्चार, देहबोली, त्यातली अभिव्यक्ती अशा तऱ्हेनं ही सर्वस्पर्शी भूमिका आकारली आहे. एक समर्थ अभिनेते म्हणून त्यांची परिपक्वता त्यातून प्रकट होते. नरेश सुरी यांनी दंडवतेंचे मित्र व माजी पोलीस अधिकारी (पांडे) असण्याची गुर्मी आणि वर्तमानानं केलेली त्यांची गोची शैलीदार पद्धतीनं पेश केली आहे. परंतु ती नाटकाच्या शैलीशी विसंगत आहे. सिद्धेश धुरींनी कंट्रोल रूममधील रूटिन डय़ुटीने बनचुका बनलेला पोलीस अधिकारी यथार्थ उभा केला आहे. प्रीता माथुर-ठाकूर यांनी कावेरीचं धूसर, संदिग्ध, भीतीग्रस्त व्यक्तिमत्त्व तुटक व अस्पष्ट संभाषणातून, श्वासोच्छवासांतील अनियमिततेतून थेट पोचवलं आहे. आशीष मेहता यांनीही कावेरीच्या नवऱ्याची दडपणाखालील मनोवस्था नेमकेपणाने व्यक्त केली आहे. लहानग्या बंटीचं निरागसपण, भीतीनं मूक होणं, दंडवतेंच्या धीर देण्यानं आश्वस्त होत त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं, बहिणीची अवस्था पाहून गोठून जाणं.. या भावभावना नील चापेकरने सूक्ष्म समजेनं दर्शविल्या आहेत.

एक सुन्न करणारा अनुभव ‘कुसूर’ देतं, हे नक्की!