बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांची चित्रपटांसोबतच खऱ्या संसारातही छान केमिस्ट्री जमली आहे. यातलंच एक कपल म्हणजे अभिनेता अजय देवगण आणि काजोल. ९०च्या दशकापासून आयुष्याच्या प्रत्येक पावलावर एकमेकांची साथ देणाऱ्या या जोडीमध्ये कधीही कुरबूर झाल्याचं ऐकिवात नाही. या जोडीमधलं प्रेम कायम पाहायला मिळतं. मात्र हे दोघं एकमेकांवर जितकं प्रेम करतात तितकीच एकमेकांची मस्करीही करतात. अलिकडेच अजयने एक मजेशीर ट्विट शेअर केलं आहे. यात त्याने, त्याच्या आणि काजोलच्या लग्नाची तुलना लॉकडाउनसोबत केली आहे.

सध्या लॉकडाउन असल्यामुळे सारं काही बंद असून प्रत्येकालाच सक्तीने घरात बसावं लागत आहे. त्यामुळेच अजयने त्याच्या लग्नाची तुलना लॉकडाउनशी केली आहे. त्याने ट्विटरवर काजोलसोबतचा एक फोटो शेअर करत मी लॉकडाउनमध्ये असल्याचं म्हटलं आहे.

“मला असं वाटतंय मी गेल्या २२ वर्षांपासून लॉकडाउनमध्येच आहे”, असं ट्विट अजयने केलं आहे. अजयने मजेशीर अंदाजात हे ट्विट केल्यामुळे अनेकांच लक्ष वेधलं गेलं आहे. मात्र हा सारा मस्करीचा भाग असून अजयचं काजोलवर अतोनात प्रेम असून तो कायम तिचा आदर करत असल्याचं पाहायला मिळतं.

दरम्यान, अलिकडेच अजयचा ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने अजय आणि काजोलने बऱ्याच वर्षानंतर एकत्र स्क्रीन शेअर केली. विशेष म्हणजे हा चित्रपट सुपरहिट ठरला असून त्याने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.