बॉलिवूडमध्ये अनेकदा चित्रपटांच्या नावावरुन किंवा त्यांच्या अधिकारावरुन वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. असाच वाद पुन्हा एकदा सुरु झाला असून प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी करण जोहर आणि अपूर्व मेहता यांच्यावर चित्रपटाचं नाव कॉपी केल्याचा आरोप केला आहे. मधुर भांडारकर सध्या कलाविश्वातील सुपरस्टार्सच्या पत्नींवर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचं नाव ‘बॉलिवूड वाइव्ज’ असं आहे. मात्र, याच काळात करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी 'Fabulous Lives of Bollywood Wives' या सीरिजची घोषणा केली. मात्र, या सीरिजच्या नावावरुन मधुर यांनी संताप व्यक्त केला आहे. याच नावाशी संबंधित मी माझा चित्रपट करत असून करण आणि अपूर्व यांनी हेच नाव त्यांच्या सीरिजला देणं चुकीचं आहे असं मधुर यांनी म्हटलं आहे. सोबतच त्यांनी या प्रकरणी इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनकडे ( आय़एमपीपीए) याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. Dear @karanjohar U & @apoorvamehta18 had asked me 4 the title #BollywoodWives for web,which I refused,as my project is underway. It is Morally & ethically wrong u to tweak it to #TheFabulousLivesofBollywoodWives. Pls do not dent my project. I humbly request u to change the title. — Madhur Bhandarkar (@imbhandarkar) November 20, 2020 "करण जोहर आणि अपूर्व मेहताने मला या सीरिजचं नाव ‘बॉलिवूड वाइव्ज’ असं ठेवलं तर चालेल का? असं विचारलं होतं. त्यावेळी मीदेखील याच नावाने चित्रपट करत आहे, त्यामुळे हे नाव ठेऊ नका, असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं. मात्र, तरीदेखील त्यांनी त्यांच्या सीरिजचं नाव 'Fabulous Lives of Bollywood Wives' असं ठेवलं. हे अत्यंत चुकीचं आहे. कृपा करुन माझ्या प्रोजेक्टचं नुकसान करु नका. माझी नम्र विनंती आहे तुम्ही या सीरिजचं नाव बदला", असं ट्विट मधुर यांनी केलं आहे. सध्या सोशल मीडियावर मधुर भांडारकर यांचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. दरम्यान, 'Fabulous Lives of Bollywood Wives' या सीरिजचा पहिला सीजन २७ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. या सीरिजमध्ये सीमा खान, महिप कपूर, भावना पांडे आणि नीलम कोठारी यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. तर मधुर भांडारकर यांनी ‘बॉलिवूड वाइव्ज’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे नाव सेन्सॉर बोर्डामध्ये रजिस्टर देखील केले आहे. या चित्रपटात शाहरूख खानची पत्नी गौरी खान, शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत आणि राजेश खन्नाची पत्नी डिंपल खन्ना यांच्या आयुष्यावर हा आधारित असल्याचं सांगण्यात येत आहे.