सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. श्रीदेवी यांच्या निधनाला आता वर्ष पूर्ण होईल. श्रीदेवी यांचं दुबईमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. श्रीदेवी यांच्या निधनानंतर कलाविश्वातील अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता श्रीदेवी यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत असताना अभिनेत्री माधुरी दीक्षितने त्यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

करण जोहरच्या आगामी ‘कलंक’ या चित्रपटामध्ये वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित हे स्टारकास्ट झळकून येणार आहेत. विशेष म्हणजे ब-याच काळानंतर माधुरी आणि संजय दत्त एकत्र काम करणार आहेत. माधुरीच्या वाट्याला आलेली भूमिका प्रथम दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी साकारणार होत्या. मात्र त्यांच्या अकस्मित झालेल्या निधनामुळे ही भूमिका माधुरीच्या वाट्याला आला. या भूमिकेविषयी बोलताना माधुरीने श्रीदेवी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

‘२०१८ हे वर्ष बॉलिवूडमधील साऱ्याच कलाकारांसाठी धक्कादायक होतं. या वर्षात श्रीदेवी यांचं निधन झालं. मुळात त्यांचं निधन होणं ही गोष्ट माझ्या पचनीच पडली नाही.  त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत नाही तोच त्यांची ‘कलंक’मधील भूमिका  मला साकारायला  मिळणार असल्याचं समजलं. हे ऐकल्यानंतर तर मी सुन्नच झालं’, असं माधुरीने सांगितलं.

श्रीदेवी यांच्या विषयी बोलत असताना माधुरीने त्यांची एक आठवणी यावेळी शेअर केली. ‘फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या बर्थ डे पार्टीमध्ये आमची शेवटची भेट झाली. पार्टीमध्ये त्या त्यांच्या दोन्ही मुलींसोबत आल्या होत्या. या पार्टीत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा पाहण्यासारखा होता. मात्र ही भेट शेवटची ठरेल असं तेव्हा चुकूनही आम्हाला वाटलं नव्हतं. आयुष्य फार लहान आले. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंद जगा’.

दरम्यान, माधुरी दीक्षित आता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सक्रीय झाली आहे. तिचा आगामी ‘टोटल धमाल’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण, अनिल कपूर, अर्शद वारसी, संजय मिश्रा आणि जावेद जाफरी ही स्टारकास्ट मंडळी झळकणार आहे.