यंदाचं वर्ष बॉलिवूडसाठी लग्नसराईचं ठरत आहे. दीपिका-रणवीर, प्रियांका-निक या लोकप्रिय जोड्या लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर चाहत्यांना अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाचे वेध लागले आहेत. अनपेक्षितपणे एका चित्रपटाच्या निमित्ताने या दोघांची जोडी जमली आणि ते एकमेकांना डेट करु लागले. विशेष म्हणजे या जोडीने कधीही चाहत्यांपासून किंवा प्रसार माध्यमांपासून त्यांचं नातं लपवलं नाही. त्यांच्या नात्याविषयी दोघांच्याही कुटुंबियांना माहित असून आलियाचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट यांनी या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे.

आलिया आणि रणबीर रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली महेश भट्ट यांनी एका मुलाखतीमध्ये दिली आहे. आलिया-रणबीर एकमेकांच्या प्रेमात आहेत. आता हे नातं पुढे कसं न्यायचं हा अधिकार फक्त त्या दोघांनाच आहे, असं ते म्हणाले.

‘रणबीर आणि आलिया यांच्या नात्याविषयी साऱ्यांनाच ठाऊक आहे. हे नातं आता लपलेलं नाही ते जगजाहिर झालं आहे. रणबीर एक चांगला मुलगा आहे. तो मला आवडतोदेखील. हे नातं आता पुढे कसं न्यायचं हा अधिकार या दोघांनाही आहे. ते आता मोठे झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणात बोलण्याचा मला अधिकार’, असं महेश भट्ट म्हणाले.

पुढे ते असंही म्हणाले, ‘आयुष्य हे आपल्या अटींवर जगायचं असतं. त्यामुळे आपण आयुष्यात काय करतो हे आपल्याला समजलं पाहिजे. सध्या या दोघांचं नातं एका चांगल्या वळणावर आहे. मात्र पुढे ते कोणत्या वळणावर जाईल हे माहित नाही. त्यामुळे आपण फक्त य प्रतीक्षा करु शकतो’.

दरम्यान, महेश भट्ट यांना रणबीर-आलियाच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला असला तरी लग्नावर बोलणं टाळलं आहे. ‘ते कोर्ट मॅरेज करणार की पारंपारिक पद्धतीने हे मी सांगू शकत नाही. त्यांच्या रिलेशनशिप कसे पुढे जाते, यावर सगळे काही अवलंबून आहे’, केवळ एवढेच ते म्हणाले.