मकरंद अनासपुरे, तेजा देवकर, रविंद्र मंकणी, रवीराज आणि ज्योत्स्ना राजोरीया यांचा आगामी चित्रपट ‘पाणी बाणी’ ८ जूनपासून महाराष्ट्रातल्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची कथा ही गावात ठाण मांडून बसलेल्या जीवघेण्या दुष्काळाची आहे. आजवर मराठी चित्रपटामधून बरेच नवनवीन विषय हाताळले गेले आहेत असाच एका डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या संकल्पनेवर आधारित दिग्दर्शक सदानंद दळवी व प्रज्योत कडू आणि निर्माते अतुल दिवे यांनी ‘पाणी बाणी’ हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसमोर आणला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये संगीतकार आणि गायक म्हणून कार्यरत असलेले अतुल दिवे, यांनी आता चित्रपट निर्मितीमध्येही पदार्पण केले आहे. ‘स्वरसाक्षी’ प्रॉडक्शन बॅनरखाली ‘पाणी बाणी’ नावाचा चित्रपट यांनी तयार केला असून त्यांनी जलसंवर्धनाचा संदेश देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे. आतापर्यंत अतुल दिवे यांची १५०० गाणी रेकॉर्ड झाली असून ३५०० गाण्याचे प्रोग्राम त्यांनी केले आहेत.

या चित्रपटातील गीतांना अतुल दिवे यांनी गीतबद्ध केले असून दिवे यांनी वैशाली माडे यांच्यासोबत गायनातही आपला सहभाग नोंदविलेला आहे. संगीत संयोजनामध्ये शिव राजोरीया आणि मधु रेडकर यांनी अतुलना सहकार्य केले आहे. या चित्रपटाचे संगीत झी म्युझिक कंपनी मार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहचले आहेच.

या चित्रपटा विषयी अधिक माहिती देताना अतुल म्हणाले की “सामाजिक बांधिलकी आणि ज्वलंत समस्येला केंद्रस्थानी ठेवून पाणी बाणीची निर्मिती करण्यात आलेली आहे. आज शहरात व खेडेपाड्यात पाणीटंचाई भीषण आहे. त्या पाणीस्त्रोताचे संवर्धन आणि नवीन स्त्रोताची निर्मिती करणे काळाची गरज आहे. पाण्याचे थेंब न थेंब साठवले पाहिजे तेव्हाच सगळीकडे आनंदी आनंद पसरू शकले. यावरच पाणी बाणी ची निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रेक्षकांनी चित्रपटातून आनंद आणि संदेश घ्यावा.”

या चित्रपटाच्या कथानकात गावाने अनेक वर्ष पाऊस पाहिलेला नाही. दुष्काळाला कंटाळून येथील तरुण गाव सोडून जात असताना बाहेर गावाहून आलेला एक तरुण त्यांना आश्वासन देतो की तो तुमच्या सर्वांच्या मदतीने गावातील दुष्काळाचा नायनाट करू शकतो. मात्र गावातील जमीनदार या तरुणाचा डाव उलथून टाकण्याचा सतत प्रयत्न करत असतो. परंतु गावकऱ्यांच्या साथीने तरुण गावाला दुष्काळ मुक्त करतो.

बाहेर गावाहून आलेल्या तरुणाची भूमिका मकरंद अनासपुरे यांनी साकारली असून यात नायक श्रमदानातून गावात जलयुक्त शिवार निर्मितीसाठी झटत आहे. नायकाचा डाव उलथून टाकणाऱ्या जमीनदाराची भूमिका रविंद्र मंकणी सकारात आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकवेळी नायकाच्या पाठीशी उभी राहणारी व चित्रपटात सरपंचाच्या (रविराज) मुलीची भूमिका तेजा देवकर (नायिका) यांनी बजावली आहे.