अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांनी आता प्रसारमाध्यमांसमोर अधिकृतपणे नात्याला स्विकारलं आहे. आयुष्यात दुसऱ्यांदा संधी क्वचितच मिळते, असं म्हणत मलायकाने अर्जुनसोबतच्या नात्याला कबुली दिली होती. त्यापूर्वी या दोघांबद्दल बऱ्याच चर्चांना उधाण आलं होतं. तेव्हा नात्यावर बोलणं अर्जुन-मलायकानं टाळलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने अर्जुनसोबतचं नातं प्रसारमाध्यमांसमोर कबूल का केलं यामागचं कारण सांगितलं.

‘पिंकविला’ या वेबसाइटला मलायका व तिची बहीण अमृता अरोराने मुलाखतीत दिली. या मुलाखतीत मलायका म्हणाली, ”आमच्याबद्दल खूप चर्चा पसरल्या होत्या. कोणत्याही आधाराविना गोष्टी प्रसारमाध्यमांमध्ये दाखवल्या जात होत्या. त्या चर्चांचा माझ्या कुटुंबीयांवर परिणाम होत होता. रोज उठून पाहिलं तर एक नवी बातमी दिसायची. शेवटी म्हटलं की आपणहूनच खरं काय ते सांगून चर्चांना पूर्णविराम देऊ.”

अर्जुन तुला कसा वाटतो असा प्रश्न अमृताला विचारता असता ती म्हणाली, ”तो खूप शांत आहे.” या मुलाखतीत मलायकाने तिच्या लग्नाबाबतच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली. ”मला कळत नाही की लोकांना इतकी घाई का आहे. एकमेकांना पूर्णपणे ओळखण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि सध्या यातच आनंदी आहोत,” असं मलायका म्हणाली.

मलायका आणि अरबाज खान यांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. १८ वर्षांच्या संसारानंतर हे दोघे विभक्त झाले. सध्या अरबाज जॉर्जिया अँड्रियानी या मॉडेलला डेट करत आहे.